चिन्मय गवाणकर
आज चाळिशीत असलेल्या पालकांच्या उमेदवारीच्या काळातील म्हणजे १९९० च्या दशकात संगणक अभियांत्रिकी ही अत्यंत प्रतिष्ठित आणि दुर्मीळ शाखा म्हणून ओळखली जात असे. त्या वेळी निवडक महाविद्यालयांमध्येच ती उपलब्ध होती आणि प्रवेश केवळ सर्वोत्तम विद्यार्थ्यांनाच मिळत असे. आज, २०२५ मध्ये, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. संगणक अभियांत्रिकी आता सर्वाधिक लोकप्रिय आणि सामान्य अभियांत्रिकी शाखा झाली आहे. या शाखेच्या संगणक अभियांत्रिकी विथ डेटा सायन्स / विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स / विथ रोबोटिक्स / विथ सायबर सिक्युरिटी वगैरे वगैरे भरपूर उपशाखाही निघाल्या आहेत. संगणक अभियांत्रिकीच्या जागांची संख्या वाढत असताना यांत्रिक (मेकॅनिकल), स्थापत्य (सिव्हिल) विद्याुत (इलेक्ट्रिकल ) आणि रासायनिक (केमिकल ) अभियांत्रिकीसारख्या पारंपरिक शाखांमधील जागा कमी होत आहेत.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) आकडेवारीनुसार, १९९० च्या दशकात, संपूर्ण भारतात संगणक अभियांत्रिकीसाठी दहा हजारपेक्षा कमी जागा होत्या. ही संख्या १९९१ च्या उदारीकरणानंतर आणि मग इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उदयानंतर वाढू लागली. २००० पर्यंत, वायटूके ( 2 ङ) मुळे अमेरिकेत भारतीयांना भरभरून नोकऱ्या मिळू लागल्या. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी जागांची संख्या ५० हजारच्या जवळपास पोहोचली. २०१० पर्यंत, हा आकडा तीन लाखांवर गेला, तर २०२० पर्यंत, भारतात संगणक अभियांत्रिकीच्या जागा सहा लाखांपेक्षा अधिक झाल्या. आज, २०२५ मध्ये, एआयसीटीईच्या अधिकृत आकडेवारीनुसार, संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित शाखांमध्ये (आयटी, एआय आणि डेटा सायन्स) दरवर्षी आठ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.

याचा अर्थ १९९० मध्ये जी शाखा ‘अत्यंत प्रतिष्ठित’होती, ती आता ‘सामान्य’ आणि ‘सर्वत्र उपलब्ध’ अशी झाली आहे. परिणामी प्रवेशाची स्पर्धा कमी झाली, परंतु ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची स्पर्धा मात्र वाढली आहे.

संगणक अभियांत्रिकीची मागणी वाढली, तसतशी यांत्रिक, स्थापत्य, विद्याुत आणि रासायनिक अभियांत्रिकीसारख्या पारंपरिक शाखांमधील कमी होत गेली. एआयसीटीईच्या आकडेवारीनुसार १९९५ मध्ये, यांत्रिक अभियांत्रिकीच्या जागा संगणक अभियांत्रिकीच्या तुलनेत तीन पट अधिक होत्या. २०१० पर्यंत, त्या समान झाल्या, तर २०२५ पर्यंत, संगणक अभियांत्रिकीच्या तुलनेत ४० टक्के राहिल्या. गेल्या १० वर्षांत, बऱ्याच महाविद्यालयांनी पारंपरिक अभियांत्रिकी शाखांमधील जागा कमी किंवा बंद करून संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांसाठी वापरल्या आहेत.

तसेच पूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयात हमखास मिळणारे कॅम्पस जॉब्सही हल्ली दुर्मीळ झालेत. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज ( NASSCOM) आणि भारतीय उद्याोग महासंघ ( CII) च्या अहवालांनुसार २०१५ मध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्या प्रत्येकी ३० ते ४० हजार पदवीधर विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकरी देत होत्या. त्या वेळी सरासरी ८० टक्क्यांहून अधिक संगणक अभियांत्रिकी पदवीधर कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवत आणि बाकीचे सहसा उच्च शिक्षणासाठी जात. कॅम्पस नोकऱ्यांचे सरासरी प्रारंभिक वेतन रु. ३.५ ते ४.५ लाख प्रतिवर्ष होते. ते साधारण २००० सालापासून त्याच पातळीवर होते.

२०२० मध्ये मोठ्या आयटी कंपन्यांची भरती २०-३० टक्क्यांनी कमी झाली. ६० टक्के संगणक अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनीच कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवल्या. (पाच वर्षांत २० टक्के घट ). एआय, मशीन लर्निंग, आणि डेटा सायन्स या नवीन क्षेत्रात उच्च कौशल्य असलेल्या उमेदवारांना चांगले वेतन मिळत होते.

२०२५ मध्ये म्हणजे आजच्या काळात केवळ ४०-४५ टक्के संगणक अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थीच कॅम्पसवरून थेट नोकऱ्या मिळवितात. सामान्य प्रोग्रामिंग नोकऱ्यांचे वेतन स्थिर राहिले आहे किंवा (फुगवट्याचा विचार करता) घटले आहे. २५ वर्षांपूर्वी कॅम्पसवर मिळणाऱ्या वार्षिक अडीच ते तीन लाख रुपयांच्या नोकऱ्या अजून त्याच श्रेणीमध्ये अडकल्या आहेत. महागाई निर्देशांक लक्षात घेता परिस्थिती किती दारुण आहे ते समजेल. विशेष कौशल्ये असलेल्या उमेदवारांसाठी (एआय, क्वांटम कम्प्युटिंग, साइबर सिक्युरिटी) वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांना प्रतिभावान उमेदवार मिळत नाहीत. लार्सन अँड टुब्रो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ( इएछ), हिंदुस्तान पेट्रोलियम ( ढउछ) यांसारख्या संस्थांच्या अहवालांनुसार, योग्य कौशल्य असलेले यांत्रिक, नागरी आणि विद्याुत अभियंते मिळणे हे त्यांच्यापुढील मुख्य आव्हान आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या एचआर विभागाच्या एका अहवालानुसार ‘गेल्या दहा वर्षांत, आम्हाला उच्च श्रेणीच्या यांत्रिक अभियंत्यांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी तीन ते चार पटीने अधिक कॅम्पस भेटी द्याव्या लागत आहेत, कारण अधिकांश प्रतिभावान विद्यार्थी संगणक अभियांत्रिकीची निवड करतात.’

लार्सन अँड टुब्रोचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणतात: ‘बहुतांश महाविद्यालयांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची जागांची संख्या इतकी कमी झाली आहे की आम्हाला आता आमच्या मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक गुंतवणूक करावी लागत आहे. कारण पदवीधर विद्यार्थी आवश्यक तांत्रिक कौशल्यांसह येत नाहीत.’

हे सर्व कमी की काय म्हणून साधारण २०२२ ला एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने उदय झाला. २०२३-२५ या काळात, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि आयटी उद्याोगावर लक्षणीय प्रभाव पाडला आहे. एआय-आधारित कोड जनरेशन टूल्स जसे की GitHub Copilot, CodeWhisperer, आणि अन्य लार्ज लँग्वेज मॉडेल्स ( LLMs) साध्या प्रोग्रामिंग कामांना स्वयंचलित करू लागले आहेत. त्यामुळे फ्रेशर्सना प्रोग्रॅमर्स म्हणून घेण्याची गरज हळूहळू कमी होत चालली आहे.

नासकॉमच्या अलीकडील एका अभ्यासानुसार २०२५ संपेपर्यंत, एंट्री-लेव्हल कोडिंग जॉब्सपैकी ३० टक्के एआय टूल्सद्वारे किंवा कमी मनुष्यबळाने केले जाऊ शकतात. भारतातील आउटसोर्सिंग नोकऱ्यांमध्ये आता २५ टक्के एआय ऑटोमेशन आहे. उमेदवारांकडे केवळ बेसिक कोडिंग कौशल्ये असणे आता पुरेसे नाही; त्यांना अॅडव्हान्स्ड प्रोग्रामिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, एआय इंटिग्रेशन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग यांसारख्या विशिष्ट कौशल्यांची आवश्यकता आहे.

यातून दिसते की ‘संगणक अभियांत्रिकी पदवी = सुरक्षित नोकरी’ हे समीकरण आता कदाचित अचूक नाही. केवळ पदवी असणे पुरेसे नाही; विशिष्ट कौशल्ये, प्रॅक्टिकल अनुभव, आणि सतत शिकण्याची क्षमता अधिक महत्त्वाची झाली आहे.

त्यामुळे संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, पालक आणि विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींचा विचार करावा:

१. संस्थेची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा

सर्व संगणक अभियांत्रिकी पदव्या समान नाहीत. एनआयटी, आयआयटी, किंवा टॉप-रँकच्या खासगी संस्थांमधून पदवी मिळवणे हे मध्यम दर्जाच्या संस्थांच्या तुलनेत अधिक मूल्यवान आहे. ‘संस्थेची निवड ही शाखेच्या निवडीपेक्षा अधिक महत्त्वाची असू शकते,’ असे भारतीय उद्याोग महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर घोष म्हणतात. ‘उत्कृष्ट संस्थेतील कोणतीही शाखा अनेकदा निम्न-दर्जाच्या संस्थेतील संगणक अभियांत्रिकीपेक्षा चांगली असू शकते.’ पण फार कमी पालक चांगल्या संस्थेेपेक्षा, मिळेल तिकडे संगणक शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवतात आणि मुलांचे नुकसान करतात.

२. कौशल्यांचा विचार

संगणक अभियांत्रिकीत प्रवेश करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये तार्किक विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता, गणित आणि अॅल्गोरिदम्समध्ये रुची, सतत शिकण्याची इच्छा, अमूर्त संकल्पनांसह काम करण्याची क्षमता ही आवश्यक कौशल्ये आणि आवड आहे का हे स्वत:ला विचारावे.

३. व्यावसायिक अपेक्षांचे वास्तवदर्शी मूल्यांकन

२०२५ मधील कॅम्पस प्लेसमेंट डेटानुसार फक्त वरच्या १० टक्के संस्थांमधील विद्यार्थ्यांना उच्च वेतनाच्या नोकऱ्या मिळतात. मध्यम दर्जाच्या संस्थांमधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्या मिळत नाहीत. मध्यम दर्जाच्या संस्थांमधून सरासरी प्रारंभिक वेतन २००१-०२ च्या स्तरावरचे म्हणजे फक्त रु. तीन ते चार लाख प्रतिवर्ष आहे.

४. पर्यायी शाखांचा विचार

बदलत्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी यांत्रिक अभियांत्रिकी- रोबोटिक्स/ऑटोमेशन, विद्याुत अभियांत्रिकी- ईव्ही टेक्नॉलॉजी, रासायनिक अभियांत्रिकी-सस्टेनेबल एनर्जी या इतर अभियांत्रिकी शाखांचाही विचार करावा.

सध्या नॉन ग्लॅमरस असलेल्या स्थापत्य (सिविल ) आणि विद्याुत (इलेक्ट्रिकल ) शाखांना थोड्याच वर्षांत सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. कारण पाश्चात्त्य देशांमधले रस्ते, पूल, विमानतळ, मेट्रो वगैरे पायाभूत सोयी सध्या किमान ५० वर्षे जुन्या झाल्यात आणि लवकरच त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी लाखोंनी स्थापत्य अभियंते लागतील. इलेट्रिकल कार्ससारख्या क्षेत्रामुळे आणि एआयसाठी लागणाऱ्या डेटा सेंटर्समध्ये आवश्यक विजेसाठी शाश्वत ऊर्जास्राोत लागतील आणि रसायन आणि विद्याुत अभियंत्यांनाही मागणी वाढेल.

५. विशेष कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा

संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतल्यास, विशिष्ट क्षेत्रात विशेषज्ञता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स / मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग क्वांटम कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज ( कळ) अशा कोर्सेससाठी सरकारने सुरू केलेले ‘स्वयं’सारखे खूप छान मोफत अथवा अल्प फीमध्ये शिकवणारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तसेच बऱ्याच खासगी विद्यापीठांचे MOOC ( Massive Online Open Courses ) सुद्धा अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत.

६. फक्त पदवीवर अवलंबून राहू नका.

प्रत्यक्ष प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, हॅकाथॉन्समध्ये सहभाग, आणि प्रॅक्टिकल स्किल्स हे अनेकदा डिग्रीपेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. तसेच नेतृत्वगुण, टीमवर्क अशी कौशल्ये शिकणे प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य आहे.

उद्याची अभियांत्रिकी शिक्षण पद्धत

एआयसारख्या तंत्रज्ञानाने बेसिक कोडिंग आणि प्रोग्रामिंग सोपे केले आहे. कोड लिहिण्याऐवजी, उद्याचे अभियंते एआय टूल्सचा वापर करून जटिल समस्या सोडवतील. नवीन कौशल्यांमध्ये प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग, एआय सिस्टम्स इंटिग्रेशन, आणि अॅडव्हान्स्ड प्रोग्रामिंग आर्किटेक्चरचा समावेश असेल. एथिकल हॅकिंग, साइबर सिक्युरिटी, आणि डेटा गोपनीयता उद्याच्या अभियांत्रिकीचा अविभाज्य भाग असतील. संगणक अभियांत्रिकीच्या जागांच्या विस्ताराने आणि एआय टेक्नॉलॉजीच्या उदयामुळे, आता केवळ पदवी मिळवणेच पुरेसे नाही. संस्थेची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची स्वत:ची कौशल्ये आणि रुची आणि उद्याोगातील बदलत्या गरजांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.
chinmaygavankar@gmail.com
(लेखक एका बहुराष्ट्रीय सल्लागार संस्थेचे भागीदार असून त्यांना गेली २४ वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अनुभव आहे.)