डॉ. सुजाता पाटील
अन्न असुरक्षा हा एक गंभीर जागतिक प्रश्न असून विकसित आणि विकसनशील देशांमधील लाखो लोकांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. अलीकडील अंदाजानुसार जगभरात सुमारे ८० कोटींपेक्षा अधिक लोक सातत्याने उपासमार सहन करत आहेत. दारिद्र्य, संघर्ष, हवामान बदल, आर्थिक अस्थिरता आणि संसाधनांचे असंतुलित वितरण हे या समस्येचे प्रमुख घटक असले तरी मानवी कृत्यामुळे निसर्गावर होणारे आघात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांपैकी परागीभवन या नैसर्गिक क्रियेला मिळालेला छेद ही एक मोठी समस्या आहे. यामुळे अन्नधान्य उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परागीभवन हा निसर्गातील अनोखा अविष्कार आहे जो घडवून आणण्याचे कार्य फुलपाखरे, भुंगे, हमिंग बर्डसारखे लहान जीव अविरत करतात. यामध्ये प्रमुख भूमिकेत असते- मधमाशी! त्यामुळे तिचे जतन, संवर्धन अत्यंतिक महत्वाचे आहे. मधमाशींचे कार्य केवळ मध गोळा करण्यापुरते सीमित नसून जैवविविधतेचा आधारस्तंभ म्हणून शेती आणि पर्यावरणाच्या समतोलासाठीही तिचे योगदान अमूल्य आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या मते ‘जर पृथ्वीवरून मधमाशी नष्ट झाली तर अवघ्या चार वर्षांत संपूर्ण मानव जात नष्ट होईल.’ यातून मधमाशांचे निसर्गचक्रातील स्थान अधोरेखित होते. मधमाश्या केवळ मध गोळा करत नाहीत, तर संपूर्ण अन्नसाखळीचा पाया मजबूत करतात. पृथ्वीवरील सपुष्प वनस्पतींपैकी सुमारे ८० टक्के वनस्पतींमध्ये परागीभवनाची प्रक्रिया आवश्यक असते. जर परागीभवनाची ही प्रक्रिया थांबली, तर वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नष्ट होतील, फळे, भाजीपाला आणि धान्यांचे उत्पादन जवळजवळ संपुष्टात येईल. जागतिक अन्नसंकट ओढवेल. संपूर्ण मानव जातच नष्ट होण्याचा धोका वाढेल.
सध्या जगभरात मधमाशांच्या सुमारे २५ ते ३० हजार प्रजाती आहेत. जगातील एकूण पीक उत्पादनात मधमाशांचे सुमारे ३५ टक्के योगदान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेतील मधमाशी तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण जगातील अन्न उत्पादनाच्या जवळपास एक तृतीयांश भाग हा मधमाशांवर अवलंबून आहे. जगभरातील ११५ प्रमुख पिकांपैकी ८७ पिकांचे उत्पादन परागीभवनावर अवलंबून आहे आणि ही प्रक्रिया मधमाशांमुळेच प्रभावीपणे पार पडते. मधमाशांच्या संख्येत होत असलेली घट ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही, तर ती जगाच्या अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम करणारी जागतिक आपत्ती आहे. यावर्षी आंबा उत्पादनात झालेली घट हे याचे जिवंत उदाहरण आहे.
कॅलिफोर्नियामध्ये जवळपास ६५ टक्के मधमाशांच्या वसाहती नष्ट झाल्यामुळे बदाम उत्पादनात मोठी घट झाली आहे. नेपाळमध्ये २०१२ ते २०२२ दरम्यान मध उत्पादनात तब्बल ५० टक्के इतकी घट झाली आहे. गुजरातमधील कच्छ भागात डॉर्फ मधमाशा (अपीस फ्लोरिआ) नष्ट झाल्याने खजूर, लिंबू, पपई आणि केसर या पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. पश्चिम नेपाळमधील जमला जिल्ह्यात अपीस सेरेना मधमाशांची संख्या कमी झाल्यामुळे सफरचंदाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले असून त्याची गुणवत्ता ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे.
कॅनडामध्ये ब्लूबेरी, चेरी आणि सफरचंद या पिकांमध्ये परागीभवन प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण न झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. अमेरिकेतील २०१८ मधील एका अहवालानुसार, देशात ४० टक्के मधमाशांच्या वसाहती नष्ट झाल्या आहेत. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की मधमाशांचे कमी होत असलेले प्रमाण हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या अन्नसाखळीचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न बनला आहे.
जोहान डिझियरझोन यांना आधुनिक मधमाशीपालन आणि मधमाशीपालनाचे जनक मानले जाते. १८४५ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या शोधनिबंधात डिझियरझोनने असे म्हटले की राणी मधमाशी आणि मादी कामगार मधमाशा या फलित अंड्यांपासून तयार होतात, तर ड्रोन (नर मधमाशी) मात्र फलित न झालेल्या अंड्यांपासून तयार होतात. तसेच, अपरिपक्व मधमाशांच्या आहारामुळे त्यांच्या पुढील भूमिकांमध्ये बदल घडतो, हेही त्याने सूचित केले. मधमाशांच्या समूहामध्ये राणीमाशी, नरमाशी आणि कामकरी माशी असे प्रकार असतात. साधारण एका समूहात १००-२०० नर मधमाशा, २० हजार ते एक लाख कामकरी माशा आणि केवळ एकच राणीमाशी असते. राणीमाशीचे कार्य हे फक्त अंडी घालण्यापुरतेच मर्यादित असते. तिचा आकार साधारण दोन ते अडीच सेंटीमीटर इतका असतो. इतर मधमाशा आकाराने लहान असतात. अन्न गोळा करण्याबरोबरच पोळी बांधणे, राणीची सेवा करणे, अंड्यांचे व पोळ्याचे रक्षण करणे आणि मध तयार करण्याचे काम कामकरी मधमाशा करतात. या संपूर्ण कार्यात कामाची विभागणी आणि कमालीची शिस्त ही मिलिटरी शिस्तीपेक्षाही वरचढ असते. हे सामूहिक शक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, मधमाशा अन्न शोधण्यासाठी पोळ्यातून बाहेर पडतात आणि पोळ्यापासून अन्नाचे स्रोत किती अंतरावर आहेत आणि कोणत्या दिशेस आहेत हे पोळ्यातील इतर माशांना सांकेतिक भाषेत सांगतात, ज्याला मधमाशीचे नृत्य असे संबोधले जाते. त्यामध्ये गोल नृत्य आणि वॅगल नृत्य असे दोन प्रकार असतात. अन्नस्रोत जवळ असल्यास गोल नृत्य केले जाते आणि त्यातून अन्नस्त्रोताची गुणवत्ता व प्रमाण कळते. जर अन्नस्त्रोत ५० मीटरपेक्षा जास्त असेल, तर वॅगलनृत्य केले जाते. यामध्ये मधमाशी इंग्रजी 8 आकारात नृत्य करते ज्यातून अन्नस्रोताची दिशा कळते.
मधमाश्यांचे पोळे हे अत्यंत शिस्तबद्ध, वैज्ञानिक पद्धतीने एखाद्या कुशल अभियंत्याप्रमाणे बांधले जाते. पोळे बांधण्यासाठी मधमाशा सुरक्षित जागेची निवड करतात ज्यामुळे हवामान बदलाचा परिणाम पोळ्यावर होणार नाही. कामकरी माश्या आपल्या शरीरातील ग्रंथी मधून मेण निर्माण करतात. हे मेण त्या आपल्या मागील पायावर जमा करतात आणि त्याचा वापर पोळे बांधण्यासाठी केला जातो. मेणापासून षटकोनी आकारात कप्पे तयार केले जातात. ही रचना मजबूत व जागेचा अधिकतम वापर करणारी असते. या षटकोनी कप्प्यांमधे नर मधमाशा, कामकरी मधमाशा यांचे वास्तव्य असते, मध, परागकण आणि राणी माशीने घातलेली अंडी ठेवण्याची व्यवस्थादेखील असते.
मधमाश्यांकडून मध निर्मिती कशी होते हा एक कुतूहलाचा विषय आहे. मधमाश्या आपल्या जिभेने फुलातील मधुरस ओढून घेतात. तो त्यांच्या शरीरातील विशिष्ट कप्प्यात साठवला जातो. हा कप्पा पूर्ण भरण्यासाटी त्यांना जवळपास हजार फुलांपर्यंत जावे लागते. एकदा मधुरस आत घेतला की त्यातील साखरेची संयुगे तोडली जातात आणि त्यातून घन रूपातील साधी साखर तयार होण्यास मदत होते. हा मधुरस पोळ्यांकडे आणला जातो. या रसापासून मध बनवण्यासाठी पोळ्यातील तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके असावे लागते. त्यामुळे मधुरसातील पाण्याचा अंश बाष्प होऊन निघून जातो. हे तापमान योग्य त्या प्रमाणात राखण्यासाठी मधमाश्या आपल्या पंखांच्या साहाय्याने पोळ्याभोवती वारा घालतात. मधमाश्यांच्या शरीरातील विशिष्ट ग्रंथींतून तयार होणारे एन्झाइम, सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुकटोजमध्ये करते. ज्यावेळी ही संयुगे पातळ होतात तेव्हा पोळ्यातील या कप्प्यांना झाकण लावले जाते. अशा पद्धतीने नैसर्गिक मधाची निर्मिती होते.
मधमाशीपासून केवळ मध मिळतो असे नव्हे, तर रॉयल जेली पण तयार केली जाते, जी फक्त राणी मधमाशीला दिली जाते. रॉयल जेलीचा उपयोग औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. मेणाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये आणि मेणबत्त्या तयार करण्यासाठी होतो. प्रोपोलिस हे पोळे सील करण्यासाठी वापरतात. याचे अँटीबायोटिक गुणधर्म आहेत. मधमाशीच्या विषाचा उपयोग सांधेदुखी, संधिवात यांसारख्या आजारांवर होतो. पृथ्वीतलावर पिनोक्रोबिन अँटिऑक्सिडंट केवळ मधमाशा तयार करू शकतात. मध आणि प्रोपोलीस यामध्येच हा घटक आढळतो ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रुकटोज साखर असते. ग्लुकोज रक्तात तत्काळ शोषले जाते ज्यामुळे कार्यशक्ती वाढते. फ्रुकटोज साखर हळूहळू शोषली जाते जी शरीराला ऊर्जा पुरवते. मधाचे सेवन केल्यामुळे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांमुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते. मधात स्निग्ध पदार्थ नसल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच सोडियम नसल्यामुळे रक्तदाबही वाढत नाही.
ग्लोबल केमिकल्स आऊटलुक या आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार, अनेक कीटकनाशकांमुळे मातीच्या आरोग्यावर, पाण्याच्या स्रोतांवर आणि जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमध्ये ‘नीओनिकोटिनाइड्स’ या रसायनाचा समावेश आहे. याचे नर मधमाशांच्या शुक्राणूंवर घातक परिणाम होतात. शिवाय, राणी मधमाशीची संख्याही या रसायनांमुळे घटते. ही रसायने मधमाशींच्या नजरेवर परिणाम करतात. त्यामुळे त्या फुलांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, वाट चुकतात, पोळ्यापर्यंत परत येऊ शकत नाहीत. यामुळे संपूर्ण पोळ्याच्या जीवनचक्रावर परिणाम होतो. रासायनिक कीटकनाशकांचा संपर्क मधमाशांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करतो. काही कीटकनाशके राणी मधमाशीच्या अंड्यातील वाढ खुंटवतात, ज्यामुळे नवीन मधमाशांची संख्या घटते. क्लोरोपायरोफॉस सारखे कीटकनाशक वापरल्यास मधमाशांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो, राणी मधमाशा अपूर्ण वाढ होऊन मरतात. कीटकनाशकांच्या दीर्घकालीन परिणामांमुळे मधमाशा पोळं सोडून जातात, आणि संपूर्ण वसाहत नष्ट होते. काही देशांनी अशा कीटकनाशकांवर बंदी घातली आहे.
भारत सरकारने ‘राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान (एनबीएचएम)’ नावाची एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना मंजूर केली असून ही द्विवर्षीय योजना वैज्ञानिक मधमाशी पालनाबाबत जनजागृती आणि विकास यासाठी कार्यान्वित आहे. एनबीएचएमचे मुख्य उद्दिष्ट भारतामध्ये मधमाशीपालनाला चालना देणे, शाश्वत शेतीला पूरक व्यवसाय निर्माण करणे, मध उत्पादन वाढवणे, आणि परागीकरणाद्वारे कृषी उत्पादन सुधारणे हे आहे.
मधमाशी वाचवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणे व सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. मधमाशी अनुकूल पीक रचना करणे, ग्रामीण भागात मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणे हे हि तितकेच महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात काही शेतकरी मधमाशी पालन करतात. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो आणि शेतात उत्पादनही वाढते. शाळा, महाविद्यालयांतून मधमाशीबाबत माहिती देणे व जागृती करणेदेखील आवश्यक आहे.
संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संस्थेने २०२५ या वर्षासाठी ‘आपणा सर्वांना पोसण्यासाठी निसर्ग प्रेरित मधमाशी’ ही संकल्पना जाहीर केली आहे. कारण जगातील प्रत्येक तृण, प्रत्येक फूल, आणि शेवटी आपली अन्नसाखळी या संपूर्ण घटकांच्या मुळाशी मधमाशांचे अतुलनीय योगदान आहे.
(के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर येथे प्राणीशास्त्र विभागात कार्यरत.)