राज्यात एकीकडे हिंदी सक्तीवरून धमासान सुरू असताना १०वी, १२वीच्या ‘लातूर पॅटर्न’साठी प्रसिद्ध असलेल्या लातूरने मात्र इतर राज्यांमधल्या अन्य भाषिक शिक्षकांच्या बळावर शिक्षण क्षेत्राची ‘बाजारपेठ’ होण्याची ‘क्षमता’ ओळखली आहे. राजस्थानातील कोटाच्या धर्तीवर लातूरमध्येही नीट किंवा जेईई परीक्षा देऊ पाहणाऱ्यांसाठीची फॅक्टरी एकदम जोमाने सुरू आहे. शिक्षणाच्या कंपनीकरणाचा हा रिपोर्ताज… स्थळ :‘ट्युशन एरिया’, लातूर वेळ : सकाळी नऊ ते सव्वा नऊ. मुंग्यांना गणवेश घातला तर त्या कशा दिसतील? काळा किंवा निळा शर्ट, कॉलरचा रंग लाल. बाहीला त्याच रंगाची लहान पट्टी. एक कसलासा लोगो. एका वारुळाची अनेक तोंडे, तसंच काहीसं रूपडं या वेळेत दिसणारं. प्रत्येक गल्लीतून लाल, पिवळा, निळा असा अंगरखा घातलेले हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. चेहरे तेवढे वेगळे. कोणी चष्मा घातलेले, कोणी बिनचष्म्याचे. मिसरुड फुटलेली ही मुलं. त्याच वयाच्या मुली. हातात एक पुस्तक. ‘स्पायरल’ केलेल्या ‘नोट्स’. असा एकही जिल्हा नसेल जेथून इथं कोणी आलं नसेल. इथे प्रत्येकाला डॉक्टरच व्हायचं आहे. काही मोजकी मंडळी ‘आयआयटी’मध्ये जाण्यासाठी आलेली. ही संख्या बदलत राहते, बाजारपेठेच्या गरजेनुसार.
येथे येणाऱ्याची विभागणी फक्त दोनच प्रकारांत. ‘नीट’ आणि ‘आयआयटी’, बाकीचं जग सगळं शून्य. जणू त्याचं अस्तित्वच नाही. एकदा का दहावीचा निकाल लागला, की आपल्या मुलामुलींसह लातूरला येणाऱ्या आईबाबाचं जग फक्त या दोन परीक्षांभोवती फिरतं राहावं, अशा रचनेचे आता पूर्ण व्यावसायीकरण झालेलं आहे. ती व्यवस्था आता घट्ट पाय रोवून उभी राहिली आहे. त्या ‘फॅक्टरी’तील ही मुलं. चार, तीन, दोन मजली वसतिगृहाच्या इमारतीतून बाहेर पडलं की समोरच्या गाड्यावर ‘पोहे’ आणि ‘निलंगा राइस’च्या वेगवेगळ्या डिश. पोहे आणि मसाला भात एकत्र करूनही नव्या चवीचा नाश्ता होतो, ही या वयोगटाची ‘क्रीएटिव्हिटी’. तरी एका गाड्यासमोर असतील ५० जण. आता मुलं पुन्हा वसतिगृहात जातात आणि पुन्हा शिरतात ‘नीट’ परीक्षेच्या वारुळात. मुंबईतील चाळीत पूर्वी माणसं कमी जागेत संसार मांडायची. तशी पाट्यांची गर्दी आहे या भागात. त्यावर मुलांचे टिकल्या-टिकल्यांचे फोटो. यशस्वी चेहरे, यातील काहींचा चष्म्यांचा नंबर वाढलेला अगदी छायाचित्रात ठळक दिसतो. या चेहऱ्यांच्या भोवती उभी राहिलेली बाजारपेठेची उलाढाल ६५० कोटींची. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सगळ्या रचनाच बदलल्या. सध्या शिकवणीवर्गाच्या नव्या विकेंद्रित प्रारूपामुळे ही उलाढाल आताशा घटलेली आहे, हे विशेष. वर्गात शिकवलेलं समजत नाही, तेव्हा खास लक्ष देता यावं म्हणून शिकवणी लावण्याचा काळ मागे पडला, त्याला आता तीन दशकं झाली. १९८७ मध्ये लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा एक मुलगा वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र झाला आणि लातूर बदलू लागलं. लातूर शहरातील शिवाजी चौकातून औसा रोडकडे जाताना उजवीकडे वळलं की ‘ट्युशन एरिया’चा भाग सुरू होतो. खरं तर हा भाग औद्याोगिक वसाहतीसाठी राखीव. त्यामुळे या भागात मोठी गोदामं. पत्र्याचे निवारे. शैक्षणिक मूल्य ‘उद्याोगी’ कसं बनलं याचा साक्षीदार असणारा हा भाग.
सात वर्षांपूर्वी… २६ जुलै २०१८
लातूरच्या शिकवणी वर्गाच्या पाट्यांमध्ये तेव्हा ‘ स्टेप बाय स्टेप ’ नावाचा शिकवणी वर्ग होता. त्याचे संचालक होते अविनाश चव्हाण. २६ जुलै २०१८ रोजी, म्हणजे गुरुवारी चव्हाण यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. ‘कुमार मॅथ्स’ नावाच्या शिकवणी वर्गाचे चालक चंदनकुमार यांनी २० लाख रुपयांत सुपारी देऊन चव्हाण यांची हत्या केल्याचा आरोप होता. बिहारहून आलेल्या चंदनच्या ‘कुमार मॅथ्स’मध्ये फक्त सात मुलं होती. चंदन यांच्या शिकवणीमध्ये मुलं आणण्याचं काम अविनाश चव्हाण करायचे आणि चंदन यांनी फक्त शिकवायचे असा त्यांचा व्यवहार ठरला होता. या व्यवहारात पुढे वाद झाले आणि चव्हाण यांची हत्या झाली. यातील पाच आरोपींना गेल्या सात वर्षांत जामीन मंजूर झाला. यातील काही आरोपी आजही ‘ट्युशन एरिया’मध्ये काहीबाही कामं करतात. आरोपी चंदन आता शिकवत नाही. पण एका शिकवणी वर्गात त्यांची भागीदारी असल्याचं पोलीस सांगतात. या भागातील पैसा वाढला. हत्येची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. पुढे या भागातील गुन्ह्यांवर पोलिसांनीही विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. गुन्हा करून मिळणाऱ्या पैशांपेक्षाही या भागात जास्त कमाई होते. त्यामुळे आता केवळ मुलींवरून होणाऱ्या हाणामाऱ्याच तेवढ्या असतात अधूनमधून. गुन्ह्यांचं कंपनीकरण हे असं होत असावं.
वर्षभरापूर्वी…
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लातूरच्या २८ कॉफी शॉप्समध्ये पोलिसांनी आधी सहज पाहणी केली. तेव्हा लक्षात आलं की, तीन कॉफी शॉपमध्ये अगदी छोटी दालनं केली होती. म्हणजे दोघांनाच थांबता येतील अशी. वातावरण अंधारं. या कॉफी शॉपमध्ये बऱ्याचदा मुलं-मुली दिसायची. त्यामुळे अशी दालनं पोलिसांनी काढून टाकली. पुढे काही कॉफी शॉपही बंद करण्यात आले. गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरच्या ‘हुशारी’ला बाधा येणाऱ्या गोष्टी दुरुस्त केल्या जात आहेत. आता लातूरप्रमाणे नांदेडचा शिकवणी वर्गाचा भाग विस्तारू लागला असताना काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच तक्रार केली, की शिकवणी भागात ड्रग्जचा व्यवसाय सुरू झाला आहे. शिकवणी वर्गाचा भोवताल बदलत जाताना होणाऱ्या बाजारूपणाचा असा काळा रंग गडद होऊ दिला जात नाही. तो गडद व्हावा, अशी कोणाची इच्छा असणार नाही. पण त्याकडे दुर्लक्षही करून कसं चालेल ?
प्रवेशाची वेळ…
लातूरमध्ये पूर्वी एकनाथ जालनापूरकर नावाचे शिक्षक ‘मॅथ्स’ची शिकवणी घ्यायचे. नाडापुडे यांच्याकडे केमिस्ट्री. ही लातूरची नावं. प्रत्येक शहरात शिकवणी वर्गाची ओळख शिक्षकांच्या नावाने होती. शिक्षकांच्या अध्यापनकौशल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांच्या मागे लागायचे. आम्हाला जरा अधिक वेळ द्या, सराव घ्या. मुलांकडे आवर्जून लक्ष देणारे पालक शिकवणी वर्गातील शिक्षकाची आवर्जून भेट घेत. वर्गात फार तर दहा मुलं हुशार असायची. बाकी सगळे जण शिकवणी वर्गात किमान गुण मिळावेत म्हणून झटत राहायचे. अगदी ७५ टक्के गुण पडले तरी, ‘अरे डिस्टिंक्शन मिळालं की,’ असं म्हणत कौतुक होण्याचा काळ मागे पडला. आता लातूरमध्ये शिकवणी वर्गात प्रवेश देतानाही ९५ टक्क्यांपेक्षा कमी गुण घेणाऱ्या मुलाकडे हा जरा ‘ढ’च आहे हा, या नजरेने बघणारे आहेत. या भागात मोठ्या गोदामांच्या भोवती काही दुकानं. काही दालनं. एक टेबल, समोर तीन खुर्च्या किंवा दोन मोठ्या व्यक्ती आणि विद्यार्थी बसू शकेल, एवढाच सोफा. ब्रॅण्डचा लोगो अगदी मध्यभागी. ‘अॅडमिशन घ्यायचंय का?’ या प्रश्नाच्या उत्तरात नजरेत हो दिसलं, की स्वागत कक्षातील व्यक्ती समुपदेशकाकडे घेऊन जाते. भोवताली स्वागत करणारी मंडळी, मिनिटा मिनिटाला साफसफाई करणारी मंडळी, शिपाई पाण्याचा ग्लास घेऊन येतो. टेबलाच्या मागे बसणारा समुपदेशक. हे सारे ‘ब्रॅण्डवादी’! गणवेशात कंपनीची कार विकणारा कसा शोरूममध्ये चारचाकी गाडी दाखवतो तसे शिकवणी वर्गाची वैशिष्ट्ये मोजून दाखवणारा प्रवक्ता. हुशार मुलाच्या पालकाला नजरेत ओळखण्याची क्षमता असणारा २५ – ३० वयोगटातील तरुणाने प्रश्न केला, ‘बोला, कोणाला हवी आहे अॅडमिशन?’ दुसरा प्रश्न किती मार्क पडलेत? – उत्तरादाखल ९५.२१ टक्के आणि त्यापुढचे गुण सांगणाऱ्या पालकांना मग बॅच विकली जाते. इथलं सूत्र वेगळं. जेवढी वर्गातील संख्या अधिक तेवढं शुल्क कमी. ज्या वर्गात कमी विद्यार्थी त्याचं शुल्क अधिक. २५० विद्यार्थ्यांच्या गोदामात मुलाला बसवायचं असेल तर शुल्क एक लाख २० हजार. तसेच जेवढे गुण अधिक तेवढी शुल्कामध्ये सवलत. अशी सवलत दिल्यानंतरही प्रत्येक विद्यार्थ्याचं शुल्क किमान ८० ते ९० हजार. सांगण्याचा आकडा एक लाख २० हजार.
करोनानंतर ऑनलाइन सुविधेमुळे आणि शिकवणीच्या कंपनीकरणामुळे गावोगावी ब्रॅण्ड शिकवणी वर्ग आले आहेत. तरीही लातूरची संख्या ६० हजारांच्या घरात जाणारी. एकूण शिकवणी वर्गांची संख्या ४०. आता ही संख्या झपाट्याने घसरते आहे. काही कंपन्यांनी छोट्या शिकवणीचालकांना अक्षरश: गिळले. पूर्वी शिकवणी घेण्यासाठी तो विषय शिकवता येणं अनिवार्य होतं. पण तो निकषच आता राहिला नाही. म्हणजे ‘बिल्डर’ होण्यासाठी ‘इंजिनीअर’ असण्याची आवश्यकता नसते तसेच शिकवणी वर्ग चालविण्यासाठी शिक्षक नसेल तरी चालतं. आता इतिहास – भूगोलाचे शिक्षकही शिकवणी वर्ग चालवतात. पत्रे, फर्निचर विक्री करणारी व्यक्ती पैसा ओतते. ती उत्तर प्रदेश, बिहारमधून किंवा तेलंगणा, आंध्र प्रदेशातून शिकवणारी मंडळी आणते. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया आता परप्रांतीयांच्या हाती आहे. राजस्थानपासून ते मुंबई आणि लातूर ब्रॅण्डच्या शाखा आता जिल्ह्याजिल्ह्यात होऊ लागल्या आहेत. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. लातूरच्या शिकवणी वर्गात २५० विद्यार्थ्यांचा एक वर्ग. त्यामुळे पॅन्टच्या खिशात ध्वनिवर्धक आणि तोंडासमोर येणारा ध्वनिक्षेपक हे शिक्षकांचे रूप. यांच्याकडून शिकायचं असेल तर शुल्क एक लाख २० हजार. चर्चेनंतर कधी अगदी ७५ – ८० हजारपर्यंत खाली आणलं जातं. हे शुल्क कमी होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. पैशाच्या व्यवहाराचं बोलण समुदेशकाचा शेवटचा टप्पा. कारच्या शो रूममध्ये आधी वैशिष्ट्यं सांगितली जातात तसंच.
एकदा ट्युशन एरियामध्ये आलं की दर चार पावलांवर एक वसतिगृह आहे. वसतिगृहाच्या पाट्या बहुतांशी महिलांच्या नावाच्या. वेणुताई, कौशल्या, तेजस्विनी असे किती तरी फलक. पण आता ब्रॅण्डच्या शिकवणी वर्गाचं वसतिगृह आहे. त्याचीच खानावळ आहे. अगदी वसतिगृहातच पिठाची गिरणीही आहे. एका खोलीत दोन मुलं किंवा दोन मुली असंही वसतिगृह आहे तर काही वसतिगृहं अगदी ‘व्हीआयपी’. त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह, बाकी सर्व सुविधा. यात राहण्याखाण्याचा किमान खर्च दीड लाख रुपये. म्हणजे ११वी आणि १२वी या दोन वर्षांत एका विद्यार्थ्यामागे चार लाख रुपये किमान खर्च होतो. परिणामी लातूरची बाजारपेठ वाढती. या भागात येणाऱ्या मुलांची संख्या वाढली तसं गाव विस्तारत गेलं. या मुलांचे केस कापण्यासाठी नवीन केशकर्तनालयापासून ते कपड्यांच्या दुकानापर्यंत गावभर गर्दीच गर्दी. शनिवार, रविवारी शहरातील काही हॉटेलमध्ये जेवणासाठी वाट बघत थांबावं लागतं. कुठे पोह्याची प्लेट ७० रुपयांना तर केस कापण्याचे १५० रुपये. वेगवेगळ्या गावांतून मुलांना भेटायला आलेल्या पालकांसह मुलं एक दिवस मजा करतात. ९५ टक्क्यांची बाजारपेठ ही अशी वाढत जाते. या मुलांना लागणाऱ्या पुस्तकांची एक स्वतंत्र बाजारपेठ असल्याचं लक्षात आल्यानंतर दिल्लीच्या १६ – १७ प्रकाशकांनी शिकवणी वर्गचालकांशी संधान सांधलं. आता प्रत्येक शिकवणी वर्गाची स्वतंत्र पुस्तकंही आहेत. परिणामी स्थानिक पुस्तक विक्रेत्यांचा ४० टक्के व्यवसाय घटला. केवळ पुस्तकंच नाही तर इयत्ता सहावीपासून ‘फाऊंडेशन’चे शिकवणी वर्गही याच कंपन्यांचे आहेत.
या वर्षी ‘नीट’ परीक्षेची काठिण्य पातळी जरा अधिक होती म्हणे. तरीही उद्याोग भवनमध्ये प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी हे आणि आपल्या मुलांचा नंबर कुठे लागेल हे पालकांना सांगणारे जवळपास ३० ते ४० समुपदेशक असतील. एका मुलासाठी आकारलं जाणारं शुल्क आठ हजार रुपये. या क्षेत्रात विद्यार्थी आणि पालकांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचे उपाय माहीत असणारे समुपदेशक सचिन बांगड यांच्याभोवती प्रवेश कालावधीमध्ये सतत ३० – ३५ पालकांची गर्दी असते. हे जग पुन्हा वेगळं. ‘कट ऑफ’ , कोणत्या शहरातील कोणतं महाविद्यालय चांगलं, कोणत्या महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा कसा, कोणत्या महाविद्यालयात रुग्णांची संख्या किती असते यावर ठरणारा दर्जा. त्यानुसार शुल्क आकारलं जातं. शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी मिळणारं शुल्क, १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून मिळणाऱ्या जागा, याचा एक मोठा गुंता असतो. तो सोडविणारे स्वतंत्र समुपदेशक आहेत. आता त्यांची कार्यालयंही चमकू लागली आहेत. एक मोठी गंमत आहे. वसतिगृह असो की शिकवणी वर्ग किंवा समुपदेशक सगळ्या ठिकाणी जागा छोटी असली तरी एक अभ्यागत कक्ष आहे. व्यावसायिक संस्थेचा संचालक असो की व्यवस्थापक, त्याला बसायला ‘केबिन’ आहे. इमारतीसमोर रखवालदार आहे. हे सगळं चित्र जसं एखाद्या कंपनीत पाहायलं मिळतं ते सारं लातूरच्या ‘ट्युशन एरिया’मध्ये आहे. ते फक्त लातूरपुरतं आहे असं नाही. आता शिकवणी हा पूर्ण व्यावसायिक भाग असल्याने सर्व मोठ्या शहरांत हे चित्र सारखंच. फक्त लातूरमध्ये एकाच भागात केंद्रित झालेलं.
फॅक्टरीतील डॉक्टर
२००९-१० पासून कारखान्यात आवश्यक असणारे अभियंते आणि उत्तीर्ण होणारे विद्यार्थी यांचं प्रमाण व्यस्त होऊ लागलं. २०१४-१५ पासून अभियंत्यांचं वेतन अगदी १५ -२० हजारपर्यंत घसरलं. हाच काळ होता नीटच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. २०१६ मध्ये सहा लाख ६७ हजार विद्यार्थी बसले होते. ती आधीच्या वर्षापेक्षा १६ टक्के जास्त होती. वैद्याकीय शिक्षणाच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही परीक्षा देशभर अनिवार्य करण्यात आली आणि शिकवणी वर्गाचे प्रारूप बदललं. करोनामुळे ऑनलाइन सुविधा वाढल्या. उत्तर आणि दक्षिण भारतातील तरुण शिकवणीच्या व्यवसायात उतरले. जुनं प्रारूप बदलू लागलं. नवे ब्रॅण्ड पुढं येऊ लागले. मराठी मुलं विज्ञान आणि गणित हिंदीतून शिकू लागली. पुढे या माणसांच्या आधारे गावोगावी आपल्या कंपनीची शाखा काढता येते हे काळाने दिलेलं शहाणपण आता प्रत्येक जिल्ह्यात दृश्यरूप होत आहे. त्यामुळेच लातूरच्या ट्युशन एरियामधून ‘गणवेश’ घातलेल्या वारुळातील मुंग्या दिसतात लाखोच्या संख्येने. हे शिक्षणाचं कंपनीकरण. एका बाजूला गुणवत्तेचं केंद्र आणि दुसरीकडे अशाच फॅक्टरीतील डॉक्टर भेटतील तुम्हाला मल्टिस्पेशालिटीमध्ये काही वर्षांनी. पण तेव्हा आवर्जून लक्ष द्या, जो कोणी उपचार करत असेल त्याला विचारा, ‘बाबा, कुठे शिकलास? तुझं विद्यापीठ कोणतं? १५ टक्क्यांच्या कोट्यातून दरवर्षी २७ लाख रुपयांचं शुल्क भरून तू बाहेर पडला नाहीस ना?’ गेल्या वर्षी एका अभिमत विद्यापीठात केवळ १४४ गुणवाल्याचा क्रमांक लागला. ‘नीट’ची परीक्षा ७२० गुणांची, पण ५० टक्के न मिळविणाऱ्यासही डॉक्टर होता येतं. तेव्हा लातूरमध्ये प्रवेश सोपे जावे म्हणून प्रयत्न करणारा ३५-४० वर्षांचा तरुण सरकारकडे मागणी करत होता, ‘किमान वैद्याकीय प्रवेशाच्या कोटा पद्धतीसाठी ५० टक्के गुण अनिवार्य’ अशी अट टाका. अन्यथा कमी गुण घेणारा एखादा डॉक्टर तुमच्यासमोर उभा ठाकेल, मृत्यूसारखा!’
किमान ९५ टक्के गुण घेणाऱ्यांनी लातूर भरलं आहे. गुणवंत मुलांच्या पालकांसह सकाळी सात ते रात्री ११ पर्यंतच्या वेळापत्रकात चरका फिरतो आहे. त्यात ६० हजारांहून अधिक मुलं रोज जातात. काही जण अभ्यासक्रमाचं ओझं सहन न झाल्याने कधी तरी मृत्यूलाही जवळ करतात. गुण कमी पडले की काही पालकच अमानुष मारहाण करतात स्वत:च्या मुलांना. त्यातूनच सांगलीच्या आटपाडीमध्ये एक मुलगी जीवानिशी गेली. पण बाजारपेठेचा जोर एवढा की लाखो मुलं ही परीक्षा देतात. त्यांनी ‘नीट’ किंवा ‘जेईई ’ हीच परीक्षा द्यावी, यासाठीची बाजारपेठ मुलांना, त्यांच्या पालकांना तेवढ्याच करिअर (? ) वर लक्ष द्यायला भाग पाडते. एका गावातून १५०० हून अधिक मुलं वैद्याकीय पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाली तेव्हा जग गवसल्याच्या थाटात बॅण्ड लावून यातील काहींची मिरवणूक निघाली होती. त्यांच्या यशाचा आनंद ही बाजारपेठच तेव्हा साजरा करत होती. सध्या ही बाजारपेठ आनंदात आहे.
suhas.sardeshmukh@expressinda.com