ॲड. नोएल डाबरे
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निरपराध पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशात जनक्षोभ उसळला. जिथे मुंगीही आत शिरू शकणार नाही असे वाटत होते तिथे दहशतवादी आरामात आले आणि नृशंस हत्याकांड घडवुन निघून गेले. हे भारतीय मनाला पचण्यासारखे नव्हते. या हत्यारांचा ताबडतोब पाठलाग करुन त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. मग दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या आणि पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याच्या गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्षात पाकिस्तान सारख्या कमजोर राष्ट्राशी आपल्याला शस्त्रसंधी करावा लागला, तोही डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘शस्त्रसंधी करा नाही तर व्यापार थांबवतो’ असे सांगितल्यामुळे. तसे सांगितल्याची बढाई ट्रम्प खुलेआम मारू शकतात, आपण त्या बढाईचा इन्कारही धड करत नाही. यावरून आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची कल्पना यावी. ज्याला याची कल्पना येणार नाही तो नवाब वाजिदअली शहा सारखा मूर्ख समजावा.

आता आपण सावध झालो नाही तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतुन आपला देश स्वतंत्र केला त्यांचा तो घोर अपमान ठरेल. विकाऊ ‘मीडिया’च्या आहारी जाऊन बेगडी देशप्रेमाने वाहुन गेलेल्या लोकांनी वेळीच जागृत झालेले बरे!

पाकिस्तानच्या मिसाइल्सनी भारताची विमाने पाडली अशी विदेशी वृत्ते आहेत. किमान एकतरी राफेल विमान पाकिस्तानने पाडले अशी वदंता आहे. ती खोटी आहे असे भारतीय सैन्यही स्पष्टपणे बोलतही नाही. या बातमीमुळे राफेल बनविणाऱ्या फ्रेंच कंपनीचे शेअर्स गडगडले हे सत्य आहे. शेअर असे उगाच गडगडले का? एका तज्ज्ञांचे स्पष्ट अनुमान आहे की, तीन दिवसांच्या या लढाईत भारताचे किमान एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. एका राफेल विमानाची किंमत पंधराशे कोटी रुपये आहे. ते बघता एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले ही काही अतिशयोक्ती ठरणार नाही. शस्त्रसंधी करण्यामागे या अपरिमित हानीचाही समावेश असावा.

इतक्या हतबल अवस्थेत आपण का पोहोचलो बरे! कारणे तपासावीच लागतील. प्रमुख कारण भारतीय जनतेची सातत्याने चालू असलेली दिशाभूलच आहे. गेल्या साधारण ३० ते ३२ वर्षांत देशात मुसलमान हे देशद्रोही आहेत असे मानणारी, बहुसंख्यकांची मानसिकता झाली आहे. मुसलमानांनी या देशाला दिलेले योगदान पद्धतशीरपणे नाकारले जात आहे. त्यांच्याविषयी घृणा निर्माण करण्यात आलेली आहे. अतिरंजित चित्रपटातुन हा विखार पसरवला जातो आहे. तो बहुसंख्यांच्या मनात ईतका बिंबलेला आहे की या थिल्लर, बाजारू, अर्थहीन सिनेमांना पाहण्यासाठी बहुसंख्याकांची अलोट गर्दी लोटते. द्वेषाच्या या वणव्यात भारतीय जनता दुभंगली आहे. देश अस्वस्थ होण्यासाठी यापेक्षा अधिक कोणत्याही विषाची गरज नाही. आपण त्यातले नाही हे दाखवण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी यांना समालोचक म्हणून पुढे आणण्याची गरज का भासावी?

प्रत्यक्षात देशद्रोही कोण? जे राजकारणी, सरकारी अधिकारी, काही न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत तेच खरे देशाचे शत्रू आहेत. फार काळ गेला नाही. अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशा भ्रष्ट माणसांचा भारतीय जनतेला प्रचंड तिटकारा वाटत असे. स्वामी अग्निवेश, प्रशांत भुषण, अरुंधती रॉय, यांसारख्या लोकांनी या भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध चालविलेल्या आंदोलनाला जनतेचा भरभरून पाठिंबा असे. अशा नेत्यांना निवडणुकीत मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागे. आज काय परिस्थिती आहे? कालचे सगळे भ्रष्टाचारी आज एका झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत. हा झेंडा कुणाचा हे सांगायला नको. भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधातील आवाज इतिहासजमा झालेला आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून ते मिरवत आहेत. केवळ मुस्लीम द्वेषाच्या आहारी गेल्यामुळे जनतेला भ्रष्टाचाराशी काही देणेघेणे राहिलेले नाही. देश अधोगतीला पोहोचल्याचे हे लक्षण आहे.

पहलगाम मधील हत्याकांड हे सैन्य आणि गुप्तचर पथकांचेही अपयश मानले पाहिजे. भारतातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था काश्मीरमध्ये आहे. त्यासाठी देशाचे अब्जावधी रुपये खर्च होतात. तिथे भारतीय नागरिक सुरक्षित नसतील तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरावे? त्याहीआधीच्या, २०१९ मधील बालाकोट हल्ल्याबाबत माहिती विचारणे गुन्हा आहे का? त्या वेळी आपले विमान पाडले गेले, आपला वैमानिक पकडला गेला, आपल्या वैमानिकाला गाजावाजा करूनच सोडण्यात आले, ही अपमानास्पद बाब नाही असे कसे म्हणता येईल? मात्र इथे पराभवाचा विजयोत्सव साजरा केला गेला. सोडलेल्या वैमानिकाचे, त्याने मीमपराक्रम केल्यासारखे स्वागत करण्यात आले. ही भारतीय जनतेची शुद्ध फसवणूक होती. जनता त्याला बळी पडली. म्हणून आता इतक्या मोठ्या अपमानाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे.

हा काळ आत्मचिंतनाचा आहे, तसाच तो नव्या आशेचा देखील आहे. काश्मीरच्या मुस्लीम जनतेने घाबरलेल्या पर्यटकांना धीर देत मानवतेचे दर्शन घडविले, हे कसे विसरता येईल? हिंदु, मुस्लीम ऐक्याचा त्यांनी जणू नारा दिला आहे. त्याला आपण प्रतिसाद दिलाच पाहिजे. धर्मवेड बाजूला ठेवून एकत्र येण्याचा हा काळ आहे. देशाची सुत्रे आता जनतेने हातात घेण्याची गरज आहे. कुणाच्याही समोर न झुकणारे, साऱ्यांना एकत्र घेऊन जाणारे, भ्रष्टाचाऱ्यांना संपवणारे नेतृत्व आता जनतेने शोधून पुढे आणले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

((समाप्त))