साधनेसाठीच्या एकांतवासाविषयीचा विनोबांच्या ‘गीता प्रवचने’ पुस्तकातील परिच्छेद वाचून झाल्यावर स्वामी स्वरूपानंद म्हणाले की, ‘‘याचा अर्थ एकांतवास करू नये असा नसून त्याचा फायदा आपल्याला व्यवहारात भोगता आला पाहिजे. एकांतवासाचे व्यसन बनवू नये.’’ म्हणजे साधनाने जगण्यात निवांतपणा यावा, असं आपण मानतो आणि साधनाही निवांतपणे व्हावी, असंही मानतो. प्रत्यक्षात दोन्हीकडे मनाचा निवांतपणा काही कायमचा अनुभवता येत नाही. याचं एक कारण जगणं आणि उपासना या दोन स्वतंत्र गोष्टी आपण मानतो. ‘ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे। त्या त्या स्थळी हो निजरूप तुझे। मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी। तेथे तुझे सद्गुरो पाय दोन्ही।। असं आपण नुसतं म्हणतो, पण प्रत्यक्षात प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक अनुभवात आपण सद्गुरूंचा बोध ध्यानात आणतो का? प्रत्येक प्रसंगाच्या वेळी त्यांच्याविषयीची अस्तित्वभावना आपल्या मनात सतेज असते का? प्रत्येक प्रसंगातून ते मला काही तरी शिकवू पाहात आहेत, असं आपण मानतो का? असं मानून जर प्रत्येक प्रसंगाकडे पाहू लागलो तर सतत सद्गुरूबोधच प्रवाहित होईल. एक गुरुबंधू होते. एका छोटय़ा गल्लीतून चालले होते. दोघे जण जवळून बोलत जात होते. एक जण म्हणाला, ‘‘रस्ता किती छोटा आहे पाहा आणि त्यात मोटारींचं डबल पार्किंग करून ठेवलंय, चालणंच कठीण होतंय.’’ या साधकाला वाटलं, महाराजच सांगताहेत की आयुष्याची वाट फार छोटी आहे आणि त्यात अनेक इच्छांचं ‘डबल पार्किंग’ करून आपण आहे त्या वाटेनं जाणंसुद्धा कठीण करून ठेवतो! तेव्हा जर ‘त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे’ ही स्थिती असेल तर मनाचा निवांतपणा कधी सुटेल का हो? मग हा निवांतपणा का डचमळतो? हा निवांतपणा डचमळण्यामागे आपली साधनाही असू शकते! आश्चर्य वाटतं ना? कारण साधनेनं तर मनाचा निवांतपणा, निश्चयीपणा वाढला पाहिजे. मग मन अधिकच अस्वस्थ का व्हावं? तर साधनेनं मन हळवं, कोमल बनू लागतं आणि बाह्य़ जगाचा प्रभाव मनातून कणमात्रही ओसरला नसल्यानं आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या प्रसंगांनी आपण अधिकच प्रभावित होतो. साधना कितीही तोडकीमोडकी असू द्या, जो ती नियमित करतो त्याचं मन सूक्ष्म होण्याची प्रक्रिया सुरू होतेच. ते मन अधिक हळवं बनतं आणि प्राथमिक स्थितीतील साधकाच्या मनावर जगाचा प्रभाव इतरांपेक्षाही अधिकच पडतो. सर्वसामान्य माणूस प्रसंग येईल त्याप्रमाणे अभिव्यक्त होतो, हसतो-रडतो, भांडतो-ओरडतो. जगाच्या बऱ्यावाईट वागण्याला तो तितकीच बरीवाईट प्रतिक्रिया देऊन टाकतो. अगदी सामान्य साधकालादेखील तसं साधतंच असं नाही. लोकांच्या विपरीत वर्तनानं मनाला अधिकच क्लेश होतात. ज्या परमात्म्याचं चिंतन आपण करतो आहोत त्यानं असं दु:ख आपल्या वाटय़ाला का येऊ द्यावं, अशी बोचही उद्भवते. त्या परमात्म्याचाच मग आपण त्राग्यानं धावा करू लागतो. जगातला आपला वावरही निवांत नसतो आणि जगाच्या प्रभावामुळे साधनेतही निवांतपणा नसतो.