अश्विनी भिडे (अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका)

दर्जेदार शिक्षण तसेच शिक्षणातील नवे प्रयोग, ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’, ‘आयबी’  व  ‘आयजीसीएसई’ मंडळांच्या शालान्त परीक्षा यांपासून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे..

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, मात्र भविष्यात तो निश्चितच बदललेला दिसेल. मुंबई महापालिका  शाळांमध्ये या वर्षीपासून सुरू झालेल्या ‘सीबीएसई’ शाळांना नुकतीच दिल्लीच्या शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे पालिका शाळांमधील मुलांना आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याची संधी मिळावी, याकरिता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची  म्हणजेच ‘आय.बी.’ (इंटरनॅशनल बकॅल्युरेट) व केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित ‘आय.जी.सी.एस.ई.’ (इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकण्डरी एज्युकेशन ) बोर्डाची शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

विविध भाषिक, प्रांतीय लोकसंख्या असलेल्या मुंबईतील गरीब घरातील मुलांना महापालिकेतर्फे  मराठी, हिन्दी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलगू, कन्नड, गुजराती या आठ भाषांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. अशी ही एकमेव महापालिका आहे. त्यासाठी दर वर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते. सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या मुंबई शहरातील शेवटच्या घटकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी याकरिता महानगरपालिकेच्या  शिक्षण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या ९७३ प्राथमिक व २४३ माध्यमिक शाळांमध्ये साधारणपणे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तर ३९९ खासगी अनुदानित प्राथमिक आणि ७०३ खासगी विना-अनुदानित प्राथमिक शाळादेखील मनपा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यांमध्ये साधारणपणे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. याशिवाय पालिकेमार्फत दोन डी.एड. महाविद्यालये व बाह्य़ संस्थांच्या मदतीने तीन कनिष्ठ महाविद्यालये चालविण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाची व्याप्ती या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास, बूट, गणवेश अशा २७ शैक्षणिक वस्तू विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात. गरीब घरातील पालकांनाही आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या किंवा अन्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकावे असे वाटते, मात्र खासगी शाळेतील खर्च त्यांना परवडत नाही. त्यामुळे सर्व प्रादेशिक भाषांच्या शाळांमध्ये द्विभाषिक शाळा प्रयोग करून मातृभाषेसह इंग्रजी विषयाचे शिक्षणही दिले जात आहे.

पालिकेच्या शालेय इमारती ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून जोडण्यात आल्या असून दादर येथील ‘व्हर्च्युअल स्टुडिओ’द्वारे थेट प्रक्षेपण केले जाते. प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल वर्ग तयार करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या संकल्पना इंटरनेटच्या माध्यमातून तसेच अ‍ॅनिमेशन व व्हिडीओद्वारा समजावून सांगितल्या जातात. करोना टाळेबंदीच्या काळात महापालिकेने मराठी, हिन्दी, इंग्रजी, उर्दू या माध्यमांकरिता इयत्ता पहिली ते दहावीच्या प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र याप्रमाणे एकंदर ४० झूम व यूटय़ूब चॅनेलमार्फत शिक्षण दिले आहे.

त्यापुढे जाऊन पालिकेने या शैक्षणिक वर्षांपासून ११ ‘सीबीएसई’ शाळा सुरू केल्या. त्यांना मान्यताही मिळाली. एक ‘आयसीएसई’ शाळा सुरू करण्यात आली असून त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘आयजीसीएसई’साठी केंब्रिज विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. ‘आयबी’ बोर्डाचे अधिकारी, पालिका प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी, मंत्री आदित्य ठाकरे यांची एक प्राथमिक बैठक नुकतीच झाली असून, आगामी शैक्षणिक वर्षांत ‘आयबी’ बोर्डाची शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. माटुंगा येथील एल. के. वाघजी महापालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न ‘आयजीसीएसई’ बोर्डची शाळा सुरू होणार आहे. ‘आयबी’ बोर्डची शाळा सुरू करण्यासाठी जागेची निवड व प्रशासकीय मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोडक्यात, येत्या जून महिन्यापासून ‘आयबी’  व  ‘आयजीसीएसई’ आंतरराष्ट्रीय मंडळांची प्रत्येकी एकेक शाळा पालिकेतर्फे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

गेली काही वर्षे पालिका  शाळांतील विद्यार्थ्यांचा पट घसरत असल्याची टीका होत असली तरी ‘सीबीएसई’च्या शाळा सुरू झाल्यानंतर या शैक्षणिक वर्षांत तब्बल विद्यार्थी संख्या २९ हजारने वाढली आहे. ‘सीबीएसई’ शाळेत प्रवेश घेण्यासाठी या वर्षी प्रतीक्षा यादी तयार करावी लागली होती. भविष्यात मुंबईतील २४ प्रशासकीय विभागात एकेक ‘सीबीएसई’ शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या ‘क्लायमेट अ‍ॅक्शन प्रोजेक्ट’मध्ये पालिकेच्या तीन ‘सीबीएसई’ शाळांनी (काणेनगर, आजिज बाग आणि हरियाली व्हिलेज शाळा) बाजी मारली.  देशामध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या एकूण दहा शाळांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या दोन शाळांचा (वरळी सी फेस आणि पूनमनगर) समावेश झाला आहे.

अन्य मंडळांच्या शाळा सुरू करताना मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होते, मात्र  पालिकेच्या ‘एसएससी’ मंडळांच्या शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून जास्त आहे.  मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्याही या वर्षी वाढली आहे. अन्य मंडळांच्या शाळा सुरू करताना त्यातील काही चांगले उपक्रम, शिक्षण पद्धती सध्याच्या शाळांमध्ये राबवून या शाळांचीही दजरेन्नती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. उच्चभ्रू वर्गातील पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकत असताना प्रादेशिक भाषा टिकवण्याची जबाबदारी ही केवळ गरीब घरातील मुलांची, असा विचार करणे चुकीचे आहे. 

आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळा सुरू करणे, ही आमच्यासाठी आव्हानात्मक बाब होती. खासगी शाळेत त्याकरिता बाहेरून शिक्षक घेतले जातात. परंतु आम्ही आमच्याकडील शिक्षकांनाच प्रशिक्षण देणार आहोत. या मंडळांच्या निकषाप्रमाणे शिक्षण पद्धती राबवणे आणि त्यांची मान्यता मिळवणे, दर काही वर्षांनी  मान्यता मुदतवाढ मिळवणे, ती टिकवणे हे सारेच आव्हानात्मक आहे. पण त्यातून विद्यार्थ्यांबरोबरच आम्हाला, शिक्षण विभाग आणि शिक्षकांनाही खूप शिकायला मिळणार आहे.

आतापर्यंत शिक्षक शिकवत, फळय़ावर लिहीत, विद्यार्थी निमूट ऐकत, लिहून घेत. पण या नवीन रचनेत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारणे आणि त्यांच्या प्रश्नांचे शिक्षकांनी निरसन करणे ही मूलभूत पद्धत असेल. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची पद्धतही वेगळी असेल. केवळ एक परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापन होणार नाही. त्यांच्यामधील कलागुणांना वाव देत त्यांचे व्यक्तिमत्त्व साकारण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाईल.

आंतरराष्ट्रीय मंडळाची शाळा असली तरी तिचा अभ्यासक्रम हा आपल्याला तयार करायचा आहे. त्यांची शिक्षण पद्धती, मूल्यमापनाची पद्धत याचे आपल्याकडील विषयामध्ये रोपण करणे याचा समतोल साधावा लागणार आहे. त्याकरिता आम्ही एकेका विषयाच्या शिक्षकांचे अभ्यासगट तयार करणार आहोत. आमच्याकडील काही चांगल्या शिक्षकांनी केलेले प्रयोग, नवीन संकल्पना यांचीसुद्धा त्यात देवाणघेवाण होऊ शकेल.

पालिकेच्या शाळांमध्ये ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि विज्ञान कुतूहल भवन असेल. प्रत्येक शालेय इमारतीमध्ये प्रयोगशाळा, शालेय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्टय़ा आत्मनिर्भर बनविण्यासाठी अटल टिंकिरग लॅब,  व्यावसायिक शिक्षण, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा असेल. प्रत्येक शाळेला इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. अग्निशामक यंत्रे, लघु विज्ञान केंद्र, ध्वनिक्षेपण यंत्रणा अशा सुविधा देण्याकरिता  स्वतंत्र शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत काम सुरू आहे. शाळा इमारतींच्या सौंदर्यीकरणासाठी एक हजार कोटींची तरतूद आहे. क्रीडांगणाच्या विकासाचे काम सुरू आहे. प्रत्येक शालेय इमारतीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र हाऊसकीपिंग व्यवस्था असून सुरक्षेसाठी बाह्य संस्थेकडून कर्मचारी घेण्यात आले आहेत.  चालत जाण्याच्या दृष्टीने दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस प्रवासाची सुविधा आहे. पालिकेमार्फत प्रत्येक शालेय इमारतीमध्ये बालवाडय़ा आहेत. आरोग्य विभागातर्फे मधल्या वेळेत पूरक आहार दिला जातो.  

इयत्ता पाचवी व आठवीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. गणित, विज्ञान व  इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची आवड विचारात घेऊन या विषयांच्या ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. शाळाबाह्य  विद्यार्थ्यांसाठी विशेष पटनोंदणी मोहीम राबवून त्यांना शालेय प्रवाहात आणले जात आहे. गरीब वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालिकेने गेल्या काही वर्षांत असे अनेक उपक्रम राबवले आहेत. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळा सुरू करताना गरीब घरातील मुलांना शिक्षण मोफत मिळेल, असा आमचा प्रयत्न असेल. भविष्यात पालिकेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी ही अभिमानाची गोष्ट असेल हे नक्की!