– अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

गीतेच्या पाचव्या अध्यायात सांख्य आणि योग यांची तुलना करताना भगवंतांनी या दोहोतील अभेद सांगितला आहे. तर विनोबांनी ‘स्थितप्रज्ञ दर्शना’ची समाप्ती करताना शून्य आणि ब्रह्म ही तत्त्वे कशी एक आहेत हे स्पष्ट केले. ‘एकं साख्यं च योगं च’ या धर्तीवर हा चरण आहे. याचा अर्थ असा की हिंदू आणि बौद्ध या धर्माचे मूलतत्त्व समान आहे. वैदिक आणि भिक्षु यांचा समन्वय विनोबांनी साधला. हा समन्वय तात्त्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळय़ांवर साधला गेला. आणि हे अगदी सहज घडले.

विनोबांनी स्थितप्रज्ञ दर्शनाप्रमाणेच धम्मपदावरही (नवसंहिता) भाष्य केले. त्यांना गीताई चिंतनिकेप्रमाणे धम्मपद चिंतनिका लिहायची होती पण तेवढी उसंत मिळाली नाही.

‘भूदान यज्ञ’ हे ‘धम्मचक्र प्रवर्तना’चे आधुनिक रूप आहे असे त्यांनी नि:संदिग्ध शब्दात सांगितले. हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले ते उत्तर प्रदेशमध्ये. भूदान यात्रा तेव्हा लखनऊपर्यंत पोहोचली होती. त्याच वेळी  विनोबांनी गीताईच्या ध्यानाचा श्लोक तयार केला. आणखी योगायोग असा की त्यांना पहिले ग्रामदान उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात, मंगरोठच्या रूपाने मिळाले. तत्त्वज्ञान, उपासना आणि आचार या त्रयीचा असा समन्वय झाला.

बुद्धांचे तीन संदेश विनोबांना महत्त्वाचे मानले. पहिला वैराने वैर शमत नाही. दुसरा तृष्णाक्षय आणि तिसरा बुद्धीची कसोटी वापरणे.

या तीन तत्त्वांमध्ये विनोबांना तृष्णाक्षय अति महत्त्वाचा वाटतो. आपण आपल्या गरजा वाढवत जाऊ तर आपल्या वाटय़ाला दु:ख येणार हे अटळ आहे. तृष्णाक्षय म्हणजे आपल्या गरजा मर्यादित करणे. वासनांना आवर घालणे. त्या शिवाय खरी अहिंसा स्थापन होणार नाही, असे विनोबांचे प्रतिपादन होते.

याखेरीज बुद्धांची करुणा विनोबांना आदरणीय मानली. बुद्धांच्या पूर्वी करुणेचा घोष इतक्या स्पष्टपणे कुणी केला नाही, असेही त्यांनी सांगितले. आजचे जग अतिभयग्रस्त आहे. विज्ञानाची प्रगती होते आहे पण भीती कमी होत नाही उलट वाढतेच आहे. यापुढे विज्ञान आणि अहिंसा अथवा विज्ञान आणि हिंसा यापैकी एक मार्ग पत्करावा लागेल. मधली कोणतीही स्थिती नाही. इथे बुद्धाच्या निर्वैरतेचे तत्त्व विनोबांना उपकारक वाटते.

बुद्धांचे महत्त्व सांगताना विनोबांनी आणखी एक पेच सोडवला आहे. भारतीय परंपरेत दहा अवतारांची कल्पना आहे. यात राम आणि कृष्ण यांच्यानंतर बुद्धाचे नाव घेतले जाते. एक पक्ष ही कल्पनाच धुडकावून लावतो तर दुसरा ‘कोणता बुद्ध’ असा शोध घेत बसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोबा म्हणतात, ‘राम म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे प्रेम आणि बुद्ध म्हणजे करुणा’. सत्य-प्रेम-करुणा. ही तत्त्वत्रयी म्हणजेच अहिंसा. वैदिक, श्रमण आणि भिक्षु या तीन परंपरांचा विनोबांनी घातलेला हा मेळ अद्भुत म्हणावा लागेल.