इंग्लंडपुढे २३० धावांचे आव्हान ठेवल्यावर दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकेल, अशी भाकिते वर्तवली जात होती. पण इंग्लंडने झंझावाती फलंदाजीचा नमुना पेश करत हा सामना जिंकला. ‘‘२३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची फलंदाजी चांगली झाली. पहिल्या सहा षटकांमध्ये त्यांनी ज्या प्रकारे आमच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला, तेथेच ते सामना जिंकले,’’ असे मत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जे पी. डय़ुमिनीने व्यक केले. (Full Coverage|| Fixtures||Photos)

पराभवाबद्दल डय़ुमिनी बेशिस्त गोलंदाजीला दोषी ठरवले. तो म्हणाला की, ‘‘आमच्याकडून बेशिस्त मारा पाहायला मिळाला. आम्ही इंग्लंडला जास्त अवांतर धावा दिल्या आणि हाच दोन संघांमधला फरक होता. पण इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली, हे विसरून चालणार नाही. त्यांनी शेवटपर्यंत अपेक्षित धावगती कायम राखली. पण या सामन्यात आमची फलंदाजी चांगली झाली, आमच्यासाठी हीच जमेची बाजू ठरेल.’’

खेळपट्टय़ांनुसार खेळ बदलायला हवा

भारतातील खेळपट्टय़ांचा पोत निराळा आहे. काही ठिकाणी पाटा खेळपट्टय़ा आहेत, तर काही ठिकाणी फिरकीला पोषक. त्यामुळे आपण कोणत्या खेळपट्टीवर खेळत आहोत, हे तुम्हाला पक्के माहिती असायला हवे आणि त्यानुसार खेळ बदलायला हवा, असे डय़ुमिनी म्हणाला.