नाल्यात पडून बालकाचा मृत्यू

विरार : एका आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार म्हणून वसई-विरार महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासह ठेकेदारावर तब्बल नऊ महिन्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नसली तरी पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.

वसई पूर्वच्या उमेळमान परिसरात राहणारा आठ वर्षीय संप्रीत सिबाग याचा १५ फुट खोल नाल्यात पडून मृत्यू झाला. महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करताना गाळ काढत असताना हा अपघात झाला. हे काम करत असताना पालिका तसेच ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा उपाययोजना केली नव्हती. सावधानतेचे फलकही या ठिकाणी लावले नव्हते. पालिका अधिकारी-कर्मचारी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे संप्रीतला जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांनी सांगितले.