कामास विलंब झाल्याने वाहतूक कोंडी ठाणे : कोपरी रेल्वे पुलावर अखेर सात तुळया बसविण्याचे काम मध्य रेल्वेकडूनही पूर्ण झाले आहे. या तुळई बसविण्यासाठी १ हजार २०० टन आणि ७५० टन उचलण्याची क्षमता असलेल्या दोन क्रेन, पाच लहान क्रेन, २ पुलर यंत्र आणि १५० कामगार काम करत होते. सोमवारी सकाळी ६ वाजता या तुळया बसवून पूर्ण होणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे यासाठी सकाळी ८ वाजले. त्यामुळे सकाळी ८ वाजेनंतर पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्याचा परिणाम सकाळी वाहनचालकांना सहन करावा लागला. गेल्या दोन वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे आणि निर्माणाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. १७ जानेवारीला एमएमआरडीएने रेल्वे पुलाजवळ भुयारी रस्त्यावर सात तुळई अवघ्या सहा तासांत बसविल्या होत्या. त्यामुळे शनिवारपासून मध्य रेल्वेनेही रुळांवरील भागावर सात तुळया बसविण्याचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील चार तुळई शनिवारी बसविण्यात रेल्वेला शक्य झाले, तर उर्वरित तीन तुळई बसविण्यास सोमवारी सकाळी ८ वाजले. त्यामुळे सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. अवजड वांहनांची गर्दी वाहतूक शाखेने रेल्वे प्रशासनाला रविवारी रात्री ९ ते सोमवारी सकाळी ६ पर्यंत कोपरी पुलावर काम करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे वाहतूक शाखेने कोपरी पुलावरील वाहतूक या कालावधीत बंद करून ती इतर मार्गावरून वळविली होती. सकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी असतानाही या कामासाठी अधिकचे दोन तास मध्य रेल्वेने लावले. मात्र, सकाळी खारेगाव टोलनाका येथे थांबलेले ट्रकचालक तसेच भिवंडी, मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून येणारी वाहने बाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. सकाळच्या वेळेत वाहनांची वर्दळ नव्हती. असे असले तरी वाहतूक खारेगाव टोलनाका ते भिवंडीतील पिंपळासपर्यंत गेली होती, तर घोडबंदर येथून मुंबईत जाणाऱ्या हलक्या वाहनांनाही एल.बी.एस. आणि कोपरी बाराबंगलामार्गे सोडावे लागले. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. विलंबास कारण एकूण सात तुळया प्रत्येकी १०४ टन वजनाच्या आणि ६३ मीटर लांब होत्या. या सर्व तुळया दोन-दोन एकत्र जोडून त्या ठेवल्या जात होत्या. रविवारीही रात्रीपासून अशाच पद्धतीने काम केले जाणार होते. मात्र, मध्य रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकला उशीर झाला. त्यानंतर तीन तुळयांपैकी जोडून दोन तुळई बसविण्यात आल्या. मात्र, उर्वरित एक तुळई ही इतर तुळईंच्या एकसमान येत नव्हती. ती बसवण्यात तीन ते साडेतीन तास वाया गेले.