कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता काबीज करणे आणि महापौर म्हणून आपला उमेदवार बसविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी भाजपने अन्य पक्षांमधील बाहुबली स्वपक्षात आयात केले आहेत. यामुळे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांनी भाजप पक्ष ज्या तत्त्वांनी जिवंत ठेवला, वाढवला त्या विचारांनाच आताच्या भाजप नेत्यांनी तिलांजली दिली आहे. सध्याचा भाजप हा आयात नेत्यांचा पक्ष झाला असून गुंडांचा पक्ष बनला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस व आमदार नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

काही महिन्यांपूर्वी भाजपविषयी जे वातावरण होते ते आता पालटले आहे. शिवसेना, भाजपकडे लोकांसमोर जाण्यासाठी विषय नाहीत म्हणून कधी नव्हे एवढा समाजमाध्यमांमध्ये खालचा स्तर गाठून हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत असल्याचा आरोप त्यांनी केला.