गरज ही शोधाची जननी असते. सध्याच्या भीषण टंचाईच्या काळात पाण्याची किंमत खऱ्या अर्थाने जाणवलेल्या नागरिकांनी निरनिराळया उपायांनी जलव्यवस्थापन सुरू केले आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ चर्चा आणि परिसंवादापुरती मर्यादित राहिलेली जल साक्षरता त्यापुढे जात प्रत्यक्ष आचरणात दिसू लागली आहे. आपत्तीच्या या काळात ‘जल है तो कल है'ची जाणीव झालेल्या अनेकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाणी बचतीच्या या जुगाडावर टाकलेला एक प्रकाशझोत.. अखेर ठाण्यातील सोसायटय़ांना जाग ठाणे : जिल्ह्यात गंभीर पाणी टंचाई असून धरणांची पातळी कमालीची घटली आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत जेमतेम पुरेल इतका पाणीसाठा सध्या उपलब्ध असून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मार्चपासून नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर पाणी बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी काही गृहसंकुलांनी त्यापूर्वीच व्यापक प्रमाणात पाणी बचतीचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक इमारती पर्जन्य जल व्यवस्थापनासाठी कामे करू लागली असून यंदाच्यान वर्षी पाणी टंचाई जाणवली, मात्र पुढील काळासाठी व्यापक प्रयत्न करून पाणी टंचाई दूर करू अशा प्रयत्नांचे नियोजन सुरू झाले आहे. काही ठिकाणी पाणी वाया घालवणाऱ्या सभासदाला दंड करून पाणी वाया जाणार नाही याचीही काळजी घेतली जाऊ लागली आहे. ठाणे शहरामध्ये अत्यंत व्यापक प्रमाणांमध्ये हे प्रयत्न सुरू असून त्यातील काही सोसायटय़ांची पाणी बचतीच्या क्षेत्रातील कामाची नोंद.. सिद्धांचल सोसायटी : ठाण्यातील सिद्धांचल सोसायटीमध्ये २५२ कुटुंबे राहत असून येथील नागरिकांची पाण्याची गरज खूप मोठी आहे. या नागरिकांनी पर्जन्य जल व्यवस्थापनाची सुरुवात सोसायटीमध्ये केली आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी ते जपून वापरले जावे यासाठी सासायटीने यंदा नवे नियम अमलात आणले आहेत. त्यामध्ये इमारतीला होणारा पाणी पुरवठा दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळात पूर्णपणे बंद करण्यात येतो. या काळात पिण्याचे तसेच अन्य वापरासाठीचे पाणी पूर्णपणे बंद केले जाते. शिवाय यंदाची पाणी टंचाई लक्षात घेऊन या इमारतीच्या नागरिकांनी गाडय़ा धुणे बंद केले असून पंधरा दिवसांतून एकदा गाडी पाण्यानी स्वच्छ केली जाते. सोसायटीच्या वतीने तसे निर्देश देण्यात आले असून त्याचे पालन केले जाऊ लागले आहे. महिलांना पाण्याचे महत्त्व अधिक कळत असल्याने सासायटीच्या कार्यकारिणीमध्ये बहुसंख्य महिलांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून पाणी कमी वापरण्याचे संदेश महिलावर्गापर्यंत पोहोचवले जात आहेत. या उपक्रमामुळे यंदाच्या वर्षी पाण्याची नासाडी शून्य टक्क्यापर्यंत कमी आली असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी बचत होत असल्याची माहिती सिध्दांचल फेडरेशनचे संचालक लक्ष्मण गाजरे यांनी सांगितले. रहेजा गार्डन : ठाण्यातील रहेजा गार्डनमध्ये १३ इमारतींच्या ५ सोसायटय़ा असून त्यांचे नेतृत्व रहेजा गार्डन सहकारी संस्था करते. या संकुलाच्या प्रत्येक इमारतीचे पर्जन्य जल व्यवस्थापनाचे काम पूर्ण झाले असून त्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्याच्या दृष्टीने इथे प्रयत्न केले जात आहेत. शिवाय या इमारतींमध्ये सलोखा असल्याने एक इमारत दुसऱ्या इमारतीस टंचाईच्या काळात पाणी देते. इमारतीला पिण्याचे पाणी महापलिकेच्या माध्यमातून उपलब्ध होत असून फ्लशसाठीचे आवश्यक पाणी बोअरवेलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे सोसायटीला पुरेसे पाणी मिळत असून बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठीही सोसायटीच्या वतीने प्रयत्न केले जातात, अशी माहिती सोसायटीचे पदाधिकारी लक्ष्मण कदम यांनी दिली. एव्हरेस्ट सोसायटी : पाण्याची टंचाई असताना घरातील नळ खुले ठेवून जाणाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते. हे टाळण्यासाठी ठाण्यातील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये एक वर्षांपासून कडक नियम करण्यात आले आहेत. या ठिकाणी नळ उघडा राहून पाणी वाया गेल्यास त्या सदस्याला सुमारे २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला जातो. सोसायटी हा दंड वसूल करते. शिवाय प्रत्येकाने घर बंद केल्यानंतर एक वेगळी चावी आपल्या शेजाऱ्यांकडे ठेवण्याचाही आदेश सोसायटीकडून देण्यात आला आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन हे कायदे तयार करण्यात आल्याची माहिती या सोसायटीमधील सदस्यांनी सांगितले.