ठाणे – जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध उपायोजना राबविण्याबाबत आढावा घेण्यात आला. तर मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात १७ बोगस डॉक्टर आढळल्याचे यावेळी समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तातडीने उपायोजना राबविण्याबाबत यावेळी उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अंबरनाथ व शहापूर याठिकाणी बोगस डॉक्टर नसल्याने संबधित यंत्रणेला निकषाचा अवलंब करुन आपल्या तालुक्यात बोगस डॉक्टर सराव करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेऊन गुन्हा नोंद करावा, अशा ही सूचना यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, शालेय आरोग्य कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियत्रंण समिती, जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, जिल्हा कुष्ठरोग शोध मोहीम व जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध व पुनर्विलोकन समितीमार्फत या विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जन आरोग्य योजनेमध्ये क्यूआर कोड व आयुष्मान कार्डबाबत दिवसांच्या १०० कार्यक्रमात शिबीर आयोजित करुन जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णांसोबत येणाऱ्या सोबतींकडून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. शालेय आरोग्य जिल्हा समन्वय समितीकडून संबधित गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ व महानगरपालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनुदानित व विनाअनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, लैंगिकता, स्वसंरक्षण आदी विषयांबाबत शिबीर आयोजित करण्याच्या संबधितांना सूचना दिल्या. या बैठकीत वातावरणीय बदल व मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टाकफोर्स समितीमार्फत दर सहा महिन्यांनी प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, वातावरणीय बदल यामुळे उद्भवणाऱ्या श्वसनाच्या व त्वचेच्या आजारांबाबत प्रदूषण मंडळाने आरोग्य विभागास माहिती दिल्यास त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यास मदत होईल. प्रदूषण कमी करण्यासाठी सध्याच्या काळात विद्युत वाहनांचा वापर, प्लास्टिक बंदी, मास्कचा वापर यासंबंधी अधिक चर्चा करण्यात आली.

हेही वाचा >>>आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल

जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियत्रंण समिती, जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीमार्फत २६ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. हिवताप, डेग्यू, चिकणगुणिया, श्वसन, झिका आजार, ह्युमन मेटापॉटिस सारख्या आजारांबाबत चर्चा करुन संबधित आपत्ती व्यवस्थापन व अन्न व प्रशासन विभागाने वाजवी दरात औषधे उपलब्ध करुन द्यावीत. आरोग्य विभागाने वेळोवेळी लसीकरण करावे. वन्यप्राणी विषयक आजाराविषयक वन्यप्राणी विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत दरवर्षी होणाऱ्या शोध मोहिमेबाबत पंधरवडा जनजागृती केली जाते. २०२३-२०२४ मध्ये ३०२ रुग्ण आढळून आले आहेत. नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर दहा लाख लोकसंख्येमध्ये एकापेक्षा कमी करणे, तसेच घरोघरी सर्वेक्षण करताना़ १४ दिवसांचे नियोजन करुन ग्रामीण भागात २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण साध्य करणे, या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे यावेळी जिल्हा कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत सहाय्यक संचालक डॉ.गिता काकडे यांनी सांगितले.