लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर स्वच्छतेसाटी उपयुक्त असे ९९ कोटीचे प्रकल्प शासनाने मंजूर केले आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागू शकेल, असा दावा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शुक्रवारी दिली.

कल्याण डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरणामुळे निर्माण होणारा कचरा, कचरा विल्हेवाट, शहर स्वच्छतेचा विचार करून पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. या प्रकल्पांची शहरातील वाढती गरज महापालिकेने शासनाच्या निदर्शनास आणली होती. शासनाने या प्रकल्पांची कल्याण डोंबिवली पालिकेची गरज ओळखून घनकचरा विभागाचे ९९ कोटीचे प्रकल्प मंजूर केले आहेत. मागील तीन वर्षापासून शहर स्वच्छेतेमध्ये आघाडी घेतलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेने येत्या काळात देशातील पाच सर्वोत्तम स्वच्छ शहर महापालिकांमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. उपलब्ध मनुष्यबळ, सामुग्रीच्या साहाय्याने पालिकेने शहर स्वच्छतेचे अनेक उपक्रम शहरात राबविण्यास सुरूवात केली आहे. आयुक्त डॉ. दांगडे यांनी घनकचरा कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबर १० प्रभागांच्या साहाय्यक आयुक्तांनाही शहर स्वच्छेतेसाठी आवश्यक असलेले जनजागृतीचे उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. घनकचरा विभागाकडून शहरात कमीत कमी कचरा निर्माण होईल. या कचऱ्याची जागीच विल्हेवाट लागेल यासाठी उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; पालिका प्रशासनाकडून सानुग्रह अनुदान जाहीर

हे सर्व उपक्रम राबवित असताना येत्या २० वर्षाच्या काळात पालिका हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याने आयुक्त दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून चार प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. या प्रस्तावांमध्ये १०० टन कचरा दररोज उचलून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पातून सीएनजी गॅसचे उत्पादन केले जाणार आहे. हा गॅस पालिकेच्या कचरा वाहू वाहनांसाठी उपलब्ध करून इंधन बचतवरील खर्चात बचत केली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. ज्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही अशा कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त भरावभूमी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन नऊ कोटी, राज्य शासन १६ कोटी, पालिका ११ कोटी खर्च करणार आहे. उर्वरित ६१ कोटीच्या कचरा विल्हेवाट प्रकल्पांसाठी पालिका सार्वजनिक खासगी भागीदारी पध्दतीने एका प्रारूप विकसित करून त्या माध्यमातून प्रकल्पाची उभारणी करणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २० वर्षात कल्याण डोंबिवली शहरांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा भविष्यवेधी विचार करून या मंजूर चार प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की ही कामे हाती घेतली जातील. -डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त.