शहापूर: एखाद्या हिंदी चित्रपटात एकाच मुलीवर दोघेजण प्रेम करत होते. परंतु ती प्रेमिकाच दगाबाज निघते. तसाच काहीसा प्रकार शहापूर पोलिसांच्या हद्दीत उघड झाला आहे. एका महिलेने तिच्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शहापुर तालुक्यातील मुंबई – नाशिक महामार्गावरील उंबरखांड गावच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह ३० एप्रिलला आढळून आला होता. शरीरावरील जखमांमुळे शहापुर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक वारूनगसे, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, विकास सानप, रमेश नलावडे, मोहन भोईर, दशरथ देसले, कमलाकर शिरोसे, अनिल भोसले यांच्यासह ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे महेश कदम, कोळी, विभूते यांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.

पथकांकडून तपास सुरु असतानाच, मृताचे छायाचित्र समाजमाध्यमाद्वारे प्रसारित झाले होते. दरम्यान, हा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील पांडुर्ली येथील एका व्यक्तीचा असल्याचे समोर आले. शहापुर पोलिसांनी पांडुर्ली येथे जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीअंती अशोक मधे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एका महिलेसह तिघांनी त्याची हत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. ‘एक फुल दो माली’ अशी या गुन्ह्याची प्रेमकथा असून महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केली. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.