मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली भागात लुटमार करताना तीन चोरट्यांनी एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दाऊद अन्सारी (२९), गुल्फाम अन्सारी (२८) आणि आवेश शेख (२३) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण अभिलेखावरचे गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई नाशिक महामार्ग येथून ट्रेलर चालक अजितकुमार पाल आणि आदर्श पाल हे दोघे ट्रेलर घेऊन मुंबईच्या दिशेने येत होते. त्यांचा ट्रेलर भिवंडीतील मानकोली नाका भागात आला असता, त्यांनी आराम करण्यासाठी ट्रेलर थांबविला.

हेही वाचा >>>ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी दाऊद, गुल्फाम आणि आवेश हे तिघेही त्याठिकाणी आले. त्यांनी दोघाकडून मोबाईल मागितले. त्यास त्यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांननी आदर्श यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि १५ हजार रुपयांची रोकड नेली. घाबरलेल्या अजितकुमार यांनी तात्काळ नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान यातील आरोपी हे दाऊद, गु्ल्फाम आणि आवेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. आदर्शची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.