कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत विविध शासकीय, निमशासकीय संस्थांकडून भूमिगत सेवा वाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना पालिका अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काही संस्था, त्यांचे ठेकेदार मनमानी पध्दतीने काम करून पालिका हद्दीतील जलवाहिन्या, पथदिवे वीज वाहिन्या, काँक्रीट रस्त्यांची तोडमोड करत आहेत. अशाप्रकारे सेवा वाहिन्या टाकताना नासधूस करणाऱ्या संस्था, ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या संस्थांकडून सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करताना पालिकेच्या जलवाहिन्या, सीमेंट काँक्रीट रस्ते यांची तोडमोड करून प्रशासनासह नागरिकांना अडथळा, त्रास होईल अशा पध्दतीने कामे केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षी अशाप्रकारे बेशिस्तीने सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करणाऱ्या ठेकेदार, संबंधित नियंत्रक संस्थांवर पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले होते, असे शहर अभियंता परदेशी यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दूरसंचार, गृह विभाग, महावितरण, महानगर गॅस अशा विविध ग्राहक सेवा देणाऱ्या संस्थांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने शुल्क भरणा करून परवानग्या दिल्या आहेत. ही कामे सेवा दायी संस्थांनी पालिका अधिकारी, अभियंते यांच्याशी समन्वयाने करायची आहेत. तशा अटीशर्ती या संस्थांना टाकण्यात आल्या आहेत. तरीही, काही संस्था सेवा वाहिन्या टाकताना मनमानी पध्दतीने रात्रीच्या वेळेत पालिका प्रशासनाला पूर्व माहिती न देता जेसीबी, पोकलनेच्या साहाय्याने खोदकाम करून पालिकेच्या भूमिगत जलवाहिन्या, जल, मल वाहिन्या फोडण्याची कामे करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जलवाहिनी फुटल्यानंतर पाणी टंचाईचा फटका शहराला बसतो. जल, मलवाहिनी फुटल्यानंतर परिसराताल त्याचा त्रास होतो. नवा कोरा काँक्रीट रस्ता सेवा वाहिन्या टाकण्यासाठी फोडल्यानंतर प्रवासी वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे पालिका हद्दीत बेशिस्तीने सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करणाऱ्या विविध प्रकारच्या एजन्सी, नियंत्रक संस्था यांना प्रथम सुस्थितीत कामे करण्याची सूचना करण्यात येईल. त्यानंतर बेशिस्तीने कामे केली जाणार असतील तर अशा ठेकेदार, नियंत्रक संस्था, एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रशासन विचार करत आहे, असे शहर अभियंता परदेशी यांनी सांगितले. पावसाळ्यात ही सेवा वाहिन्या टाकण्याची कामे बंद ठेवायची का याचाही विचार प्रशासन वरिष्ठांच्या विचाराने करत आहे, असे त्या म्हणाल्या.