डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील जेट्टी आणि गणेशघाट विसर्जन घाटाजवळ खारफुटीची जुनाट झाडे तोडून, खाडी पात्रात मातीचा भराव करून भूमाफियांनी गेल्या काही दिवसांपासून बांधकामासाठी जमीन हडप करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी खाडी पात्रातील भराव स्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना हा भराव विनापरवानगी सुरू असल्याचे आणि बेकायदा असल्याचे निदर्शनास आले.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग हद्दीत हा खाडी किनारचा भाग येतो. गेल्या वर्षी देवीचापाडा भागातील जेट्टीजवळील खारफुटीची झाडे तोडून मातीचा भराव करण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले होते. पर्यावरणप्रेमी रूपाली शाईवाले यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी शासनाच्या महसूल विभाग, कांदळवन विभाग यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची चौकशी होऊन गेल्या वर्षी खाडी पात्रात भराव करणाऱ्या अज्ञात भूमाफियांविरुध्द महसूल विभागाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पाऊस सुरू झाल्याने आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही, असा विचार करून भूमाफियांनी मागील काही दिवसांपासून देवीचापाडा येथील खाडी किनारी भागात पुन्हा खारफुटीची जुनाट झाडे तोडून, या भागातील हरितपट्टा नष्ट करून मातीचा भराव खाडी पात्रात केला आहे. या भागातील खाडीतील जेट्टीच्या दोन्ही बाजुला, अंत्येष्टी विधी निवाऱ्याच्या बाजुने हे भराव करण्यात आले आहेत. महसूल, कांदळवन विभागाच्या अखत्यारित हा भाग येतो.

या भरावाची माहिती मिळाल्यावर साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, अधीक्षक अरूण पाटील देवीचापाडा खाडी किनारी मंगळवारी पोहचले. त्यांनी हे भराव कोणी केले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेथे रहिवाशांनी यासंबंधी आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. महसूल विभागाच्या अखत्यारित हा भाग येत असल्याने साहाय्यक आयुक्त सावंत यांनी कल्याणचे तहसीलदार यांना पत्र लिहून देवीचापाडा खाडी पात्रात भराव करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.

खाडी किनारा भागातून समर्पित जलदगती रेल्वे मार्ग, पालिकेच्या बाह्यवळण रस्ता, विरार-अलिबाग द्रृतगती महामार्ग जाणार आहेत. भूमाफिया खाडी किनारच्या मोक्याच्या जागा हडप करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा भराव करण्यात दोन स्थानिकांचा सहभाग असल्याची चर्चा देवीचापाडा भागात आहे.

तहसीलदारांनी उमेशनगर, सत्यवान चौक ते देवीचापाडा स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सीसीटीव्ही चित्रणातील माती वाहू डम्पर वाहनांची माहिती घ्यावी. त्या माध्यमातून भराव करणाऱ्या भूमाफियांचा शोध घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवीचापाडा उल्हास खाडी किनारी जेट्टीच्या दुतर्फा करण्यात येत असलेला मातीचा भराव बेकायदा आहे. या कामासाठी पालिकेने परवानगी दिली नाही. यासंदर्भात महसूल विभागाला पत्र लिहून भराव करणाऱ्या संंबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.