ठाणे : भिवंडी येथून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महमार्गावर शुक्रवारी सायंकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन १९ वर्षीय तरुणांचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असद अलताफ अक्रम अन्सारी (१९) आणि नेहाल सईद अहमद अन्सारी (१९), अशी अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण मित्र होते. दोघेही भिवंडी शहरातील गैबीनगर परिसरात राहत होते. शुक्रवारी सायंकाळी हे दोघे मुंबई-नाशिक महामार्गावरून दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी बाॅम्बे ढाबासमोरील हायवे दिवा येथे आली. त्यावेळेस त्यांच्या पाठीमागून एक ट्रक भरधाव येत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्रक चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अविचाराने वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे असद आणि नेहाल हे दोघे दुचाकीवरून खाली पडून त्यांच्या पोटाला, छातीला मार लागून शरीरावर खरचटून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यु झाला. दोघा मित्रांचा अपघाती मृत्यु झाल्याचे वृत्तानंतर गैबीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात प्रकरणी असद याच्या भावाचे मित्र युशा खान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक माणिक होळकर हे करीत आहेत.