कल्याण – कल्याण मुरबाड रस्त्यावरील शहाड येथील रिजन्सी एंटीलिया या गृहप्रकल्पात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे उल्हासनगरच्या कचराभूमी आणि पालिका यंत्रणेवर पडणारा कचरा उचलण्याचा भार कमी होणार आहे.

या कार्यक्रमाला रिजन्सी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक महेश अग्रवाल, संचालक उध्दव रूपचंदानी, संचालक अनिल भटिजा, उल्हासनगरच्या तहसीलदार कल्याणी मोहिते उपस्थित होते. रिजन्सी एंटीलियामध्ये सुरू करण्यात आलेल्या या बायोगॅस प्रकल्पाची क्षमता चार टन आहे. रिजन्सी एंटीलिया गृहप्रकल्पातून तयार होणाऱ्या दैनंदिन कचऱ्यावर या कचरा प्रकल्पात प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून दररोज सुमारे २४० मीटर क्युब गॅस उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून २४० युनिट वीज तयार होणार आहे. कचरा प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी या गृहप्रकल्पातील बागबगिचा, उद्यानातील झाडांसाठी वापरण्यात येणार आहे.अशाप्रकारचे प्रकल्प शासन, पालिकेच्या माध्यमातून उभारले जातात. रिजन्सी एंटीलियामध्ये अशाप्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभारून गृहप्रकल्प व्यवस्थापनाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ओल्या कचऱ्याचे जागीच विघटन करणे शक्य होणार आहे. यामुळे वाहन, इंधन बचत होणार आहे, असे प्रकल्प संयोजकांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज गृहप्रकल्प आवारातील पथदिव्यांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पथदिव्यांचा वीज खर्चाची बचत होणार आहे.

रिजन्सी एंटीलिया गृहसंकुलातून दररोज तयार होणारा ओला कचरा आणि गोशाळेतील शेणापासून याठिकाणी बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे रिजन्सी एंटीलिया गृहप्रकल्पातील कचरा कचराभूमीवर न जाता त्या कचऱ्याचे गृहप्रकल्प आवारात विघटन केले जाणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज पथदिव्यांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. या गृहप्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्प भागात ३०० हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. – महेश अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, रिजन्सी ग्रुप.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण दिनानिमित्त रिजन्सी एंटीलिया गृहसंकुलात बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे या गृहसंकुलातील कचरा याच भागात विघटित होईल. तसेच तयार होणारी वीज याच ठिकाणी वापरली जाणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून असे प्रकल्प प्रत्येक गृहप्रकल्पात सुरू होणे आवश्यक आहे. – कुमार आयलानी, आमदार, उल्हासनगर.