जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील परंपरागत बालेकिल्ल्यात विरोधकांच्या कडव्या आव्हानामुळे भाजपने येथील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण राज्यातील यंत्रणा कामाला लावली आहे.

कसब्यातील या संपर्क मोहिमेसाठी प्रदेशातील नेत्यांनी राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणीच्या नावाने एक नवा फतवा काढला असून आपआपल्या संपर्कातील, नात्यातील तसेच ओळखीचे मतदार शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची एक नवी यंत्रणा उभी केली जात आहे. मतदाराचे नाव, त्याचा मोबाइल क्रमांक, पत्ता आणि कुटुंबातील मतदार संख्येची इत्थंभूत माहिती एका अर्जाद्वारे गोळा करण्याची प्रक्रिया या माध्यमातून केली जात असून प्रत्येक जिल्ह्यातून असे किमान १०० अर्ज भरून देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांत येत्या २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही मतदारसंघांत भाजपपुढे महाविकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर झालेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारास माघार घ्यावी लागली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीचे आव्हान  आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे समर्थकही गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. कसब्यात भाजपने ब्राह्मण समाजातील उमेदवार न दिल्याचे पडसाद या मतदारसंघातून उमटले आहेत. भाजपने या ठिकाणी नेत्यांची फौजच उतरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातील त्यांच्या पक्षातील संपूर्ण यंत्रणा कसब्यात कामाला लावली असून ते स्वत:ही  प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले.