कल्याण येथील पश्चिमेतील खडकपाडा भागात मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसमवेत गरबा पाहण्यासाठी आलेल्या १५ वर्षाच्या एका मुलाचा जिवंत वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांच्यातर्फे आयोजित नवरात्रोत्सव कार्यक्रमाजवळ ही दुर्घटना घडली. कमलाकर नवले (१५) असे मयत मुलाचे नाव आहे. तो कुटुंबीयांसमवेत खडकपाडा भागात राहत होता. तो इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी रात्री मयत मुलगा कमलाकर आपल्या मित्रांसमवेत उल्हास भोईर यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी गरबा पाहण्यासाठी आला होता. गरबा नृत्य आपणास व्यवस्थित पाहता यावे म्हणून कमलाकर कार्यक्रमाच्या बाजुला असलेल्या रोहित्राच्या एका संरक्षित भिंतीवर चढू लागला. मित्रांनी त्याला मज्जाव केला. त्यांचे न ऐकता कमलाकर भिंतीचा आधार घेऊन संरक्षित भिंतीवर चढला. तेथून तो गरबा नृत्यू पाहू लागला. बाजुला रोहित्राच्या जिवंत वीज वाहिन्यांचे जाळे होते.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील शिवसेना-भाजपच्या नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रम गुरुवारी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गरबा कार्यक्रम संपल्यावर कमलाकर संरक्षित भिंतीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचा तोल गेला. तो बेसावधपणे तेथे लोंबकळत असलेल्या जिवंत वीज वाहिनींवर पडला. त्याला वीज वाहिनीची जोराचा धक्का लागल्याने तो जागीच मरण पावला. गरब्यातील स्वयंसेवक आणि कमलाकरच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.