ठाणे : राज्यात भाजपसह महायुतीची सत्ता आहे. गृह विभाग हा भाजपकडेच आहे. तरीही विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची ही कारवाई अनाकलनीय आहे, असे पत्र ठाण्यातील भाजपच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. खोटे गुन्हे दाखल होत असतील तर, घरातच बसायचे का, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही महिन्यांपासून बनावट प्लेसमेंट आणि प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. जुजबी कागदपत्रांच्या आधारे संस्था सुरु करून विद्यार्थ्यांना बड्या नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखविले जाते. विद्यार्थ्यांची आधारकार्डसह विविध कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांच्या नावावर शैक्षणिक कर्ज काढले जाते. या प्रकाराविरोधात संजय वाघुले यांच्याकडून सातत्याने आवाज उठविला गेला. त्यातून राम मारुती रोड येथील ‘सीईडीपी’ संस्थेचा गैरकारभार उघड करून अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा पैसे मिळवून दिले होते. संजय वाघुले यांचे जनसंपर्क कार्यालय रेल्वे स्टेशनच्या परिसरात आहे. त्यामुळे फसवणूक झालेले विद्यार्थी लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली, असे सांगत कोळी यांनी याप्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम पत्रात मांडला आहे. ठाणे शहरात बनावट प्लेसमेंट एजन्सी आणि बेकायदा शैक्षणिक संस्थांविरोधात विविध राजकीय पक्षांनी अनेक वेळा आंदोलने केली. पण त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. परंतु, या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी संजय वाघुले, त्यांच्यासोबतचे भाजपाचे कार्यकर्ते, इतकेच नव्हे तर १८ ते २० वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालक अशा ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. नौपाडा पोलिसांची ही कारवाई ‘अनाकलनीय’ आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सता नसताना केलेल्या आंदोलनावेळी अनेक गुन्हे अंगावर घेतले. मात्र, विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या भाजपाच्या कार्यकत्यांवर गुन्हा दाखल झाला, यामुळे मन व्यथित झाले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोणाच्या दबावाने सूड उगवला गेला
या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी कोणते पुरावे पाहिले, मारहाण झालेला आरोपी दुसऱ्या दिवशी मोकळेपणाने पत्रकार परिषद घेत होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी कोणी केली, या गुन्हयामागे कोण आहे. हा प्रश्न ूभाजपाच्या ठाण्यातील असंख्य कार्यकत्यांना पडला आहे. या आंदोलनावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे त्यांना आंदोलन मिटविण्यासाठी फोन आले. पण त्यांनी तो दबाव झुगारून लावला. भाजपासह महायुतीची राज्यात सता आहे. गृह विभाग हा आपल्याकडेच आहे. आपणही वाघुले यांना अनेक वर्ष वैयक्तिकपणे ओळखत आहात. या काळात त्यांचे एकही वावगे वर्तन आपल्याला निश्चितच आढळले नसेल. पण केवळ आकसापोटी नौपाडा पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अस्वस्थ करणारे आहेत. भाजपाची सत्ता असतानाही, पोलिसांकडून कोणाच्या दबावाने सूड उगवला गेला, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल झालेले विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या भविष्याचाही विचार झालेला नाही. या मुलांनी गुन्हेगारीकडे वळण्यासारखी परिस्थिती नौपाडा पोलिसांनी निर्माण केली. असे खेदाने म्हणावे लागते, असेही त्यांनी म्हटले आहे.
तर घरातच बसायचे का ?
यापुढील काळात भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी एखाद्या आंदोलनावेळी कोणती भूमिका घ्यावी, खोटे गुन्हे दाखल होत असतील, तर घरातच बसायचे का, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे. या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी संजय वाघुले, आरोपी डॉ. प्रमोदकुमार मौर्या आणि नौपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे सीडीआर तपासून पहावेत. त्यातून सत्य बाहेर येऊन वाघुले आणि विद्यार्थी-पालकांना न्याय मिळू शकेल. आपणही भाजपाचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केले. दैनंदिन नोकरी-व्यवसाय सांभाळून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची व्यथा जाणत आहात. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर आपण चौकशी करावी. तसेच नौपाडा पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राखणारे पोलिस कोणाच्या दबावाने खोटी कारवाई करीत असतील, तर या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृह मंत्री म्हणून आपण आम्हाला नक्कीच न्याय द्याल, असा विश्वास वाटतो, असेही त्यांनी म्हटले आहे.