डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेची डोंबिवलीतील विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीमधील तळ मजल्याला असलेले नागरी सुविधा केंद्र कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात डोंबिवली पूर्वेतील पेंडसेनगरमधील गल्ली क्रमांक पाचमधील पालिकेच्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या नागरी सुविधा केंद्रात जन्म, मृत्यू नोंदणी आणि कर भरणा, नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणारे कक्ष होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेचे नागरी सुविधा केंद्र असल्याने ते नागरिकांना कर भरणा आणि इतर कामांसाठी सोयीस्कर होते. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या पाहणीत पेंडसेनगरमधील जागा सुयोग्य असल्याचे निदर्शनास आले. या जागेत तात्पुरती सुविधा उभारणीपर्यंत डोंबिवली नागरी सुविधा केंद्र पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. या केंद्रात एकूण १६ कर्मचारी कार्यरत होते. हे सर्व कर्मचारी कल्याण मुख्यालयात तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत आहेत. पेंडसेनगरमधील जागेतील यंत्रणा कार्यान्वित झाली की तात्काळ हे केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त समीर भुमकर यांनी दिली.
डोंबिवली पूर्व भागात कायमस्वरुपी नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मानपाडा रस्त्यावरील फडके चौकातील जगन्नाथ प्लाझा इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेत नवीन नागरी सुविधा केंद्र उभारण्याची प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या केंद्रातील नागरी सुविधेची यंत्रणा उभी राहिल्यानंतर पेंडसेनगरमधील केंद्र जगन्नाथ प्लाझामध्ये कायमस्वरुपी सुरू केले जाणार आहे, असे उपायुक्तांनी सांगितले.
जूनमध्ये दोन वेळा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील स्लॅबचा (पीओपी) काही भाग कोसळला होता. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने येथील नागरी सुविधा केंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पेंडसनगरमधील कार्यालयात मंचक, खुर्ची उपलब्ध करून दिले तरी तेथील केंद्र तात्काळ सुरू होऊ शकते. किंवा प्रशासनाने जुनी डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात पत्रकार कक्षाच्या बाजुला दोन कंटेनर पेट्या आणून उभ्या केल्या असत्या तरी तेथे तात्काळ नागरी सुविधा केंद्र सुरू करता आले असते. नागरिकांचीही सोय झाली असती, अशी कर्मचाऱ्यांमधील चर्चा आहे.
नवीन जागेत नागरी सुविधा केंद्र हलविताना जुन्या जागेतील दस्तऐवज सुरक्षित नेणे, मांडणे महत्वाचे आहे. जन्म मृत्यू नोंद विभागाची अभिलेखाने भरलेली १४ कपाटे आहेत. हे सर्व अभिलेख जतन करण्याचे काम कर्मचाऱ्यांवर आहे. नागरी समस्या तक्रारी, कर भरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालय बंद झाल्याचे समजताच त्यांची अस्वस्थता वाढत आहे. नागरिकांना आता कर भरण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली येथील रिजन्सी इस्टेटजवळील ई प्रभाग, सुनीलनगरमधील ग प्रभाग, पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात कर भरणा करण्यासाठी जावे लागणार आहे. कर भरणा करण्यासाठी येणारी मंडळी ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांना या स्थलांतराचा सर्वाधिक फटका बसणार आहे. कर भरण्याचे दिवस सुरू झाले असताना केंंद्र बंद झाल्याने करदाते नाराजी व्यक्त करत आहेत.