ठाणे : वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा हापूसचा हंगाम संपलेला असतानाचा बाजारात पुण्यातील आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून येणाऱ्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून येणारा आंबा बाजारात दाखल होतो. ग्राहकांची देखील याला चांगली पसंत असते. मात्र काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा थेट फटका या आंब्याला बसला असून या दरात मोठी घसरण झाली आहे. तर बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याचे खराब होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
मुंबईसह राज्यातील प्रमुख फळ बाजारांत सध्या हापूसची आवक जवळपास बंद झाली आहे. सुमारे मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम असतो. मात्र गतवर्षी बिघडलेल्या वातावरणामुळे यंदाचा हापसू आंब्याच्या हंगाम लवकर संपला. कोकणातून येणाऱ्या हापसू आंब्याच्या हंगाम संपल्यानंतर कृषी उत्पन्न बाजारात पुण्याहून येणाऱ्या आणि कर्नाटक मधून येणाऱ्या आंब्याचा हंगाम सुरु होतो. चवीला आणि आकाराला उत्तम असलेल्या या आंब्याला फळबाजारात मोठी मागणी असते.
ग्राहक देखील आवडीने हा आंबा खरेदी करतात. यामुळे कृषी उत्पन्न बाजारात या आंब्यांची मोठी आवक होते. याच पद्धतीने गेल्या आठवड्यापासून पुण्याहून येणाऱ्या आंब्यांची आवक चांगली सुरु होती. मात्र रविवार पासून राज्यात सर्वत्र सुरु झालेल्या पावसाचा फटका या आंब्याच्या वाहतुकीला बसला आहे. शेतकऱ्यांकडून मे महिन्यात या आंब्याची हळूहळू काढणी करण्यात येते. मात्र आता पाऊस झाल्याने बहुतांश फळ गाळून पडले. तर वाहतुकीसाठी पेटीबंद करून ठेवलेल्या फळांमध्ये काहीअंशी पाणी गेल्याने आंब्याची शेल्फ लाईफ – टिकण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. तर पाऊस असाच सुरु राहिल्याने आंबा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आंबा व्यापारी विजय बेंद्रे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिणवली, घोडेगाव, जुन्नर, आंबेगाव या भागांतून मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले जाते. सुमारे मे महिना सुरु झाल्यास शेतकऱ्यांकडून याची काढणी करून पेटीबंद करून मुंबई, पुणे आणि राज्यातील बाजारपेठांमध्ये त्याची विक्री केली जाते. तर याच बरोबरीने गुजरात आणि कर्नाटक मधून येणाऱ्या आंब्याची देखील आवक मोठी असते. मात्र पावसाचा यांना देखील फटका बसला आहे. तर वाहतुकीदरम्यान देखील पाऊस असल्याने मालाचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी नितीन चासकर यांनी दिली आहे.
मागील आठवड्यात पुण्याहून येणाऱ्या हापूस आंब्याची सुमारे ५०० ते ६०० रुपये डझनने विक्री केली जात होती. मात्र या पावसामुळे नुकसान झाल्याने आंब्याच्या दरात घसरण होऊन २०० ते ४०० रुपयांनी विक्री केली जात आहे.तर इतर जातीच्या आंब्यांची देखील १०० रुपये किलोहून अधिक दराने विक्री केली जात होती. मात्र पावसाचा परिणाम झाल्याने ५० ते ७० रुपयांनी यांची विक्री सुरु आहे.