Devendra Fadnavis, Eknath Shinde ठाणे : ठाणे, वसई, विरार, पालघर, मुंबई नाशिक महामार्ग, कल्याण डोंबिवली यासंपूर्ण महामुंबई पट्ट्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांचा रोष वाढू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी घेतलेले काही निर्णय मागे घेण्याची वेळ ठाणे जिल्हाधिकाऱ्यांवर आली. रात्री १२ ते पहाटे ६ यावेळेतच अवजड वाहतूक सुरु ठेवावी असा निर्णय शिंदे यांनी घेतला. मात्र, यामुळे उद्योग जगतात नाराजी पसरली आणि माल वाहतूक जवळपास ठप्प झाली. वेगवेगळ्या महामार्गांवर मालवाहतूकीच्या गाड्यांच्या रांगा दिसू लागल्या, प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र नव्हते. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय फिरवला असे सांगितले जाते. दरम्यान, रविवारी ठाणे आणि पालघर भागातील अवजड वाहतूकीचे नियोजन पाहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आखलेला दौरा मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे रद्द केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत अवजड वाहतूक सुरु रहाणार असल्याने हा दौरा करायचा तरी कशासाठी असा सवाल शिंदे यांच्या निकटवर्तीयांमार्फत केला जात आहे.

घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा-भाईंदर, पालघर तसेच जिल्हा बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. जेएनपीटीहून येणारे कंटेनर ट्रक, जड वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी, रिक्षांचा मोठा ओघ असल्याने या मार्गावर सध्या मोठी कोंडी होत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांनी आंदोलनही केले होते. नागरिकांचा दररोज वाढणारा हा रोष पाहून बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी एक विशेष बैठक बोलावली. त्यास जेएनपीए, जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. या बैठकीनंतर शिंदे यांनी मध्यरात्री १२ ते पहाटे ६ या वेळेतच अवजड वाहने मुख्य रस्त्यांवर सोडली जातील, अशी भूमिका घेतली. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेशही शिंदे यांनी दिले. या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी नवी वाहतूक व्यवस्थेचा आदेश काढत ठाणे, नवी मुंबई आणि पालघर-वसई भागातील वाहतूक यंत्रणांना सतर्क केले. एकही अवजड वाहन मुख्य रस्त्यांवर येऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या गेल्या. पालघर भागात अवजड वाहनांसाठी विशेष थांब्याच्या व्यवस्थेचे नियोजनही हाती घेण्यात आले होते.

परंतू, या निर्णयामुळे घोडबंदरची वाहतूक सुरळीत झाली असली तरी ठाणे ग्रामीण मिरा-भाईंदर, वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या बालिकेस जीव गमवावा लागला. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. तसेच उद्योग जगतात देखील या निर्णयामुळे नाराजी पसरलेली दिसून आली. इतकी सगळी आखणी केल्यानंतरही मुख्य मार्गावर कोंडीचे दुखणे मात्र कायम राहिले. गुजरात तसेच परराज्यातून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने येण्यापूर्वीच अडवली जाऊ लागली. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील ग्रामीण भाग, वसई-पालघर महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागू लागल्या. या रांगा थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. जेएनपीए बंदरात कंटेनंर हातळणीचे गणित यामुळे बिघडू लागले. बंदरावर उतरणारा माल वेळेत गोदामे तसेच कारखान्यांपर्यत पोहोचत नसल्याची ओरड वाढू लागली अशा उद्याोग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची नवी अधिसूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंबंधी सह्याद्री अतिथिगृहात एक तातडीची बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीस शिंदे उपस्थित नव्हते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी बोलविण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरसकट दिवसभर अवजड वाहनांना बंदी करण्याच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अवजड वाहतुकीला अशा पद्धतीने बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे उद्याोगांवर मोठा परिणाम दिसेल. कोंडी टाळण्यासाठी दिवसा या वाहतुकीसाठी वेळ निश्चित करून घ्या आणि ही वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची आखणी करा, असे आदेश फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यापुर्वीचे वाहतूक बदल रद्द केले आणि नवी अधिसूचना काढली. त्यात, सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुपारच्या वेळेत बंद केलेली अवजड वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरविल्यामुळे शिंदेंचा दौरा रद्द

ठाणे आणि पालघर भागातील अवजड वाहतूकीचे नियोजन पाहण्यासाठी रविवारी एकनाथ शिंदे यांनी दौरा आखला होता. परंतू, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला रात्री १२ ते पहाटे ६ यावेळेतच अवजड वाहतूक सुरु ठेवावी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता, सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत अवजड वाहतूक सुरु रहाणार असल्याने हा दौरा करायचा तरी कशासाठी असा सवाल शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून उपस्थित केला जात आहे.