निखिल अहिरे

ठाणे :  राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यभरात भिक्षेकरी शोध आणि पुनर्वसन मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात मागील तीन आठवडय़ांपासून ही मोहीम सुरू आहे. या अंतर्गत भिक्षेकरांची नोंदणी करून त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यासाठी न्यायालयीन तसेच पोलीस प्रकिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ असल्याने या दरम्यान नोंदणी केलेले भिक्षेकरी बेपत्ता होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नोंदणी झालेल्या भिक्षेकऱ्यांचा पुन्हा शोध घेणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. तसेच सर्वेक्षण वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात ज्या ठिकाणी अधिक संख्येने भिक्षेकरी आढळून येण्याची शक्यता आहे. अशा ५० ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये अधिकतर ठिकाणे ही ठाणे शहरातील आहे. या सर्व ठिकाणांवर मागील तीन आठवडय़ांपासून भिक्षेकरांचे सर्वेक्षण आणि नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या भिक्षेकरांची नोंदणी करून  पुनर्वसनासाठी त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी सर्वप्रथम न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यानंतर पोलीस साहाय्याने भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची भिक्षेकरी गृहात रवानगी केली जाते. नोंदणी नंतर ही प्रक्रिया करण्यात काही दिवसांचा कालावधी व्यतीत होत आहे. या दरम्यान नोंदणी झालेले भिक्षेकरी त्या ठिकाणांहून बेपत्ता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्वेक्षणातील सदोष प्रक्रियेमुळे जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. तसेच १५ जूनपर्यंत संपूर्ण सर्वेक्षणाचा अहवाल सादर करायचा आहे. यामुळे इतक्या कमी कालावधीत वेळखाऊ प्रक्रिया पार पडत जिल्ह्यातील सर्व भिक्षेकऱ्यांची भिक्षेकरीगृहात रवानगी होईल का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

यासाठी भिक्षेकरी दिसताच त्याची प्राथमिक माहिती गोळा करून लागलीच त्याची रवानगी भिक्षेकरी गृहात करण्यात यावी. त्यानंतर पुढील कागदोपत्री कारवाई केल्यास हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण होईल अशा चर्चा अधिकारी वर्गात सुरू असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.

५२१ भिक्षेकऱ्यांची नोंदणी

या सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढळून आलेल्या एकूण ५२१ भिक्षेकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र वेळखाऊ प्रक्रियेमुळे इतक्या दिवसांतही त्यांची अद्याप भिक्षेकरी गृहात रवानगी होऊ शकलेली नाही.