लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना, उद्वाहक आठवड्यातून दोन ते तीन वेळा बंद राहते. रेल्वे स्थानकात या साधनांनी जाणाऱ्या प्रवाशांची कुचंबणा होते. मुसळधार पाऊस पडला की डोंबिवली पूर्व भागातील उद्वाहक बंद होते. या दोन्ही यंत्रणा सुसुस्थितीत राहतील यासाठी रेल्वे प्रशासनाने काळजी घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज अडीच ते तीन लाख प्रवासी येजा करतात. या प्रवाशांच्या झटपट सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने पूर्व पश्चिम भागात उद्वाहक, सरकता यांची उभारणी केली आहे. डोंबिवली पूर्व भागातील उद्वाहक डॉ. रॉथ रस्त्यालगत आणि भुयारी नाल्याच्या वरील भागात आहे. रेल्वे स्थानक भागातील भुयारी नाल्याची मागील २५ वर्षात पालिकेने देखभाल केली नाही. या भागात सांडपाणी, मलपाणी, पाणी पुरवठा वाहिन्यांचे जाळे आहे. पूर्व रेल्वे स्थानक परिसर सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागात नाला रुंदीकरण, वाहिन्यांचे जाळे सुस्थितीत करण्याचे काम हाती घेतले तर वाहतूक कोंडी, प्रवाशांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासन हे काम घेण्यात नेहमी हात आखडता घेते.

आणखी वाचा-रेल्वे पुल दुर्घटना घडल्यास ठाणे पालिका जबाबदार; खासदार राजन विचारे यांचा पालिकेला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाल्याच्या वरील भागात रस्त्या लगत उद्वाहक असल्याने मुसळधार पाऊस सुरू झाला की डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर, रॉथ रस्ता, नेहरू रस्ता पाण्याखाली जातो. हे पावसाचे पाणी उद्वाहकच्या काँक्रीटच्या पायाखाली जाते. यंत्रात पाणी शिरले की ते बंद राहते. अनेक दिवस ते दुरुस्त केले जात नाही, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. अशाच पध्दतीने डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना अनेक वेळा बंद असतो. प्रवासी सेवेच्या या सुविधा वेळेत चालू राहतील यासाठी रेल्वेने स्थानकात एक कायमस्वरुपी तंत्रज्ञ ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.