लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: कळवा आणि मुंब्रा परिसरात नालेसफाईची कामेच झाली नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची छायाचित्र समाजमाध्यमांवर पुरावे म्हणून सादर केली आहेत. वेळीच निर्णय घ्या नाहीतर मी वाजत गाजत हा सगळा कचरा महापालिकेच्या दारात येऊन टाकेन, असा इशारा देत काय केस करायची ती एकदा करून टाका, असे त्यांनी म्हटले आहे.

ठाणे येथील उथळसर भागात नालेसफाईचे काम असामाधानकारक केल्यामुळे मे. जे.एस इन्फ्राटेक या ठेकेदारावर पालिकेने नुकतीच कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमातून कळवा आणि मुंब्रा भागातील नालेसफाईची पोलखोल केली आहे. यामुळे पालिका घनकचरा विभागाच्या कारभारावरच उभे राहिले आहे. कळवा, मुंब्र्यामध्ये कुठेही नालेसफाई झालेली नाही. कालच्या पावसामध्ये त्याचा प्रत्यय आला. कळवा पूर्वेतील भास्कर नगर, पौंडपाडा, वाघोबानगर या परिसरामध्ये ज्यांचे हातावर पोट आहे, अशी दारिद्र्य रेषेखालील लोक राहतात. त्यांच्या घरासमोर दोन-दोन, तीन-तीन फूट इतका कचरा आलेला होता. मी यापूर्वी सांगून देखील काहीही कार्यवाही केलेली नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… चंद्रपूर : वेगवेगळ्या घटनेत दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्कर्ष आर्या नावाचा कोणी ठेकेदार आहे. त्याला कामाचा किती अनुभव आहे हे माहीत नाही. तो काम देखील करत नाही. हे ठेकेदार आपल्याला देयके मिळणारच आहेत, या विश्वासातून २२ ते २५ टक्के कमी दराने निविदा भरतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येते कि हे काम परवडणारे नाही. हे सगळे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारच्या संगनमताने (सेटींग) चालते. पण यामध्ये मरतो तो गरीब माणूस. आतातर त्यांच्यावर राखण करायला, तिथे नगरसेवक देखील नाही. त्यामुळे हा ठेकेदार तिथे कधी येतही नाही आणि काम देखील करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनाचे कुठल्या पद्धतीने काम चालू आहे, हेच कळत नाही. मी भलेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असो पण म्हणून तुम्ही लोकांची काम करायची नाही असे होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. वेळीच हे नाले साफ करून घ्या, नाहीतर या नाल्यातील सगळा कचरा एक दिवस महापालिकेसमोर स्वतः आणून टाकेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.