ठाणे : खराब रस्ते, वाहन बंद पडणे आणि अवजड वाहनांचा मध्यरात्री निर्माण झालेला वाहनांचा भार या कारणांमुळे बुधवारी मुंबई अहमदाबाद मार्ग आणि घोडबंदर येथील गायमुख घाटात वाहनांच्या रांगा लागल्या. दोन्ही दिशेकडील वाहिन्यांवर कोंडी झाल्याने मुंबईहून वसई, बोरीवलीच्या दिशेने निघालेल्या आणि तेथून ठाण्यात वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे, प्रवाशांचे हाल झाले आहेत. पहाटेपासून ही कोंडी कायम असून सकाळी १० नंतरही कोंडी सुटली नव्हती.
उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गावरून मुंबई अहमदाबाद मार्गे वाहतुक करतात. तसेच बोरीवली, वसई, मिरा भाईंदर आणि तेथून ठाण्याच्या दिशेने देखील एसटी, परिवहन सेवेच्या बसगाड्या, हलकी वाहने वाहतुक करतात. त्यामुळे नोकरदार वर्ग आणि व्यवसायिक घोडबंदर मार्गाचा वापर अधिक करतात. बुधवारी पहाटे या मार्गावरील फाऊंटन परिसरात एक वाहन अचानक बंद पडले. मध्यरात्री आणि पहाटे अवजड वाहनांची वाहतुक या मार्गावर अधिक असते. त्यात गायमुख घाटात रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या.
पहाटे फाऊंटन ते कासारवडवली पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरुवात केल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांना ही वाहतुक कोंडी सोडविताना नाकी नऊ आले. दरम्यान, सकाळी १० नंतरही गायमुख घाट, मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतुक कोंडी कायम होती. वाहतुक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. अवघ्या १० ते १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना किमान पाऊण तास लागत होता.