ठाणे – पावसाळा जवळ आल्यानं खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी खत-बियाण्यांच्या खरेदीसाठी सक्रिय झाले आहेत. यापूर्वी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना बाजारात पायपीट करावी लागत होती. आता ‘कृषिक’ ॲपमुळे ही अडचण दूर झाली आहे. या ॲपवर जिल्हा आणि तालुका निवडल्यावर तालुक्यातील विक्रेत्याकडे असलेल्या खताची आवश्यक माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार आहे.

खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पायपीट करत बाजारात जावे लागत असून त्यांचा अधिकचा वेळ खर्चीक होतो. त्यात, अनेकदा विक्रेत्याकडे खत उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होत असे. परंतु, आता शासनाने सुरु केलेल्या ‘कृषिक’ ॲप मुळे शेतकऱ्यांची ही पायपीट थांबण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना एका क्लिकवर विक्रेत्याकडे किती खत उपलब्ध आहे, कोणत्या पिकाला कोणते खत वापरले पाहिजे, अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या ॲप्लिकेशनवर जिल्हा आणि तालुका निवडला की, विक्रेत्यानिहाय तसेच ग्रेड निहाय खताची माहिती उपलब्ध होते. आपल्या तालुक्यातील विक्रेत्याकडे किती खत उपलब्ध आहे, आपल्याला ते पुरेसे आहे का, कोणत्या ग्रेडचे ते खत आहे ही सगळी माहिती घेऊनच शेतकरी विक्रेत्याकडे खत खरेदी करण्यास जाता येणार आहे. त्यासह, या ॲप वर शेतकऱ्यांना गणक यंत्र टॅबवर फळे, भाजीपाला, रोपांची संख्या, ड्रीप लेटर्स, खतमात्रा, क्रॉप कव्हर, मल्चिंग, जनावरांसाठी पशुखाद्य इत्यादीची माहिती सहज मिळणार आहे. तसेच बाजारभावाच्या टॅबमध्ये तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला पिकांचे बाजारभाव दिसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची खरेदी सोयीची आणि झटपट होण्यास मदत होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कृषिक’ ॲपचा वापर कसा करावा?

कृषिक ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करून मोबाईलद्वारे वैयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करायची आहे. त्यानंतर ॲप सुरु झाल्यानंतर ‘चावडी’ या टॅबवर जाऊन खतांची उपलब्ध माहिती दिसेल. कृषिक योजना, कृषी उत्पादने, कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन, फळे आणि भाजीपाला रोपांची संख्या गणना कृषीसंदर्भातील बातम्या तसेच सर्वात महत्त्वाचे हवामानाची माहिती देखील या ॲपवर उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ॲप चा वापर करावा असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एम. एम. बचोटीकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.