उल्हासनगर: उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत शनिवारी वडोल भागात फेस दिसून आला होता. रासायनिक सांडपाणी मिसळल्यामुळे हा फेस आल्याचा संशय पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला होता. मात्र या फेसाची पाहणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्यानंतर हा फेस नागरी सांडपाण्यामुळे झाला असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
वडोल गावाजवळ पुलाखाली वाहणारे पाणी काही उंचीवरून पडत असल्याने पुढच्या भागात फेस तयार होत असल्याचेही निदर्शनास आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर येथे उल्हासनगर महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळांनी उल्हासनगर महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
शनिवार, ३१ मे रोजी उल्हासनगर शहरात वडोल गावाजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीत फेस दिसून आला होता. पर्यावरण प्रेमींनी याची माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले. याबाबतचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सोमवारी स्थळ पाहणी करण्यात आली. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी फेस होता, त्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने संकलित केले. हे पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पृथ्थकरणासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी या पाण्याला नागरी सांडपाण्याचा वास जाणवला. तसेच रासायनिक वास जाणवला नाही, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडोल येथील पुलाखालून वालधुनी नदी वाहत असताना हे पाणी काही उंचीवरून पडते. त्यामुळे पुढच्या भागात फेस निर्माण होत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. तर त्या पुढील भागात फेस निवळल्याचेही आढळून आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वालधुनीवर फेस आल्याचा प्रकार होण्याच्या दोन दिवस आधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने उल्हासनगर महापालिकेच्या वडोलगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद असल्याचे आढळून आले. प्रक्रिया विना घरगुती सांडपाणी थेट वालधुनी नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. त्याचेही नमुने मंडळांने घेतले आहेत. याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.