उल्हासनगर : प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी ठोस काही होत नसतानाच वालधुनीत मात्र रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी उल्हासनगरच्या वडोल भागातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर फेस पाहायला मिळाला. संपूर्ण नदीच्या पात्रात फेस पसरल्याचे दिसत होते. त्यामुळे पुन्हा नदीत प्रदुषणकारी घटक मिसळल्याचा आरोप होत होता.

गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा झाली. अंबरनाथ शहरातून सुरुवात होणाऱ्या या नदीत विविध नागरी सांडपाणी वाहून नेणारे नाले मिसळतात. येथे देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांकडून अनेकदा प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्यात सोडले जाते. हे नाले वालधुनी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे नदीची दुरावस्था वाढली आहे.

मधल्या काळात उल्हासनगर शहरात जीन्स धुलाई कारखान्यामुळे मोठे प्रदूषण झाले होते. शेकडो लहान मोठे जीन्स धुलाई कारखाने थेट वालधुनी नदीत सांडपाणी सोडत होते. परिणामी याविरुद्ध सामाजिक संस्थेने राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत या कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र सक्तीचे केले. त्यामुळे हे कारखाने बंद पडले. मात्र त्यानंतर आजही वालधुनी नदीत सांडपाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत फेस पाहायला मिळाला. वडोल परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पात्रात मोठा फेस पसरला होता. या फेसाचे प्रमाण इतके होते की देशाची नदी वाहते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पावसाचा फायदा घेत यापूर्वीही अनेकदा अनेक कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडल्याचे समोर आले होते. यंदाही असाच प्रकार झाला असल्याची शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.