ठाणे: कोपरी येथील पारशीवाडी परिसरातील गृहसंकुलांच्या बाहेरून जाणाऱ्या नाल्यावरच नागरिक कचरा फेकत असून हा कचरा नाल्यात जाऊन नाला तुंबून सांडपाणी संकुलांच्या परिसरात जमा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नालेसफाईनंतरही नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जात असून त्यामुळे नाल्यांमध्ये पुन्हा कचरा जमा होत असल्याचे चित्र आहे. अशाच कचऱ्यामुळे कोपरीमधील पारशीवाडी भागातील संकुलांमधील रहिवाशी हैराण झाले आहेत.

कोपरी येथील पारशीवाडी परिसरात नव महाराष्ट्र सोसायटी, सागर सोसायटी, राजदेव, पुष्पकला, महालक्ष्मी, औदुंबर छाया तसेच इतर सोसायटी आहेत. या संकुलाच्या संरक्षण भिंतीलगत गटार आहे. या गटारांची साफसफाई पालिकेकडून करण्यात येत असली तरी या गटाराच्या परिसरात परिसरातील नागरीक कचरा टाकतात. हा कचरा नाल्यात पडून नाला तुंबतो आणि सांडपाणी संकुलांच्या परिसरात जमा होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव महाराष्ट्र संकुलांच्या प्रवेशद्वारावर सांडपाणी साठत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. तसेच मच्छर वाढले असून यामुळे डेंग्यु आणि मलेरिया होण्याची भिती स्थानिक रहिवाशांनी केली. येथे रस्त्यावर टाकणे बंद करण्यात यावे आणि नाल्याची नियमित सफाई करावी, अशी मागणी संकुलातील रहिवाशांकडून होत आहे.