बदलापूरः पूर्व मोसमी पाऊस लवकर आल्याने मे महिन्यात दिवसभर पावसाचे वातावरण असते. वातावरणात बदल झालेला असतानाच शनिवारी रात्री बदलापूर शहरात रात्री पूर्वेतील बहुतांश भागात उग्र दर्प पसरला होता. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवला. बदलापूर पूर्वेत औद्योगिक वसाहत असून त्यातून अनेकदा रासायनिक वायू सोडला जातो. त्यामुळे अनेकदा शहरात धुर पसरल्याचे चित्र असते. शनिवारीही असाच प्रकार झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.

बदलापूर शहरात पर्यावरणाची दिवसेंदिवस हाणी होत असल्याचे चित्र आहे. बदलापूर शहरात पूर्वेतील खरवई भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतून निघणारे रासायनिक सांडपाणी वाहून अंबरनाथपर्यंत वाहिनीच्या माध्यमातून नेले जाते. अनेकदा ही सांडपाणी वाहिनी बदलापूर पूर्वेतून जाणाऱ्या बदलापूर कर्जत राज्यमार्गावर फुटते. त्याचे सांडपाणी नाल्यावाटे थेट उल्हास नदीत जाऊन मिसळते. इतर अनेक मार्गांनाही रासायनिक सांडपाणी उल्हास नदी मिसळते आहे. त्यामुळे उल्हास नदीतील प्रदुषण वाढते आहे. त्यातच गेल्या काही वर्षात सातत्याने याच औद्योगिक वसाहतीतून रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वायू गळती होत असल्याने बदलापुरकरांना रासायनिक उग्र दर्पाचा सामना करावा लागतो. अनेकदा नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. डोळे चुरचुरणे, तीव्र वास जाणवल्याने नागरिक संताप व्यक्त करतात. बदलापूर पूर्वेतील बहुतांश भाग आणि पश्चिमेतील बॅरेज रस्ता आणि रमेशवाडी भागातही याचा त्रास जाणवतो. शनिवारी रात्री आठच्या सुमारास अशा प्रकारे पुन्हा एकदा रासायनिक वायू गळती झाल्याचा अनुभव बदलापुरकरांना आला. रात्री आठच्या सुमारास बदलापुरच्या खरवई भागात रासायनिक धुर पसरल्याचे जाणवत होते. थेट बदलापूर पूर्वेतील घोरपडे चौकापर्यंत या धुराचा त्रास जाणवत होता. उग्र दर्प पसरल्याने नागरिकांना दारे खिडक्या बंद करून ठेवण्याची वेळ आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री साडेआठच्या सुमारास बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या पार गेल्याची माहिती खासगी कोकण हवामान अभ्यासक अभीजीत मोडक यांनी दिली आहे. यापूर्वीही अनेकदा बदलापुरातील हवेचा निर्देशांक २०० पार गेल्याचे दिसून आले होते. तर काही महिन्यांपूर्वी नायट्रोजनची गळतीही बदलापुरकारांनी सहन केली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतून सोडले जाणाऱ्या या रासायनिक वायूवर नियंत्रण ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.