कल्याण : कल्याण शहराबाहेरील सर्वाधिक वर्दळीच्या गोविंदवाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील काँक्रिट रस्त्याखालील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमध्ये दुचाकी स्वाराचे चाक अडकून किंवा अवजड वाहनाच्या चाकात या सळ्या जाऊन मोठा अपघात या रस्त्यावर होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

या रस्त्याने नियमित जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत याची माहिती आहे. परंतु या रस्त्यावरून नव्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकाला या लोखंडी सळ्यांचा अंदाज नसल्याने तो भरधाव वेगात असेल तर या सळ्यांच्यामध्ये अडकून त्याच्या वाहनाला भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. भिवंडी, ठाणेकडून येणारी बहुतांशी वाहने दुर्गाडी किल्ला येथून गोविंदवाडी वळण रस्त्याने पत्रीपूलमार्गे इच्छित स्थळी जातात.

हेही वाचा…ठाणे: घोडबंदर मार्गासह उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, सेवा रस्त्यांचीही दुरावस्था

मुसळधार पाऊस सुरू असला की अनेक वेळा गोविंदवाडी रस्त्यावर पाणी साचते. या साचलेल्या पाण्यात सळ्या दिसून येत नाहीत. दिवसा या सळ्या चालकाला दिसून येतात. रात्रीच्या वेळेत भरधाव वेगात असलेल्या वाहन चालकाला या लोखंडी सळ्या दिसत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने या रस्त्याची देखभाल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा…२४ वर्षीय महिलेचा बदलापुरात विनयभंग, ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर केला आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण डोंबिवली पालिकेचे वरिष्ठ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत क्षेत्रीय कामापेक्षा विविध प्रकारच्या बैठकांमध्ये व्यस्त असतात. काही वेळा मंत्रालय, एमएआरडीए दौऱ्यावर असतात. वरिष्ठ अधिकारी पालिका मुख्यालयात नसले की दुय्यम दर्जाचे आणि प्रभागस्तरावरील अधिकारी सुशेगात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे शहर परिसरातील दुरवस्थेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढत आहेत.