कल्याण– कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरील रेल्वे मार्गिकेवर मुसळधार पावसाचे पाणी साचले आहे. रेल्वे मार्ग जलमय झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल दिवा, डोंबिवली परिसरात थांबविण्यात आल्या आहेत. ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा रेल्वे स्थानकापर्यंत कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंबिवली, कल्याण परिसर जलमय झाला आहे. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. कामावरुन संध्याकाळी घरी परतणाऱ्या नोकरदारांना या जलमय परिस्थितीचा फटका बसला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याणच्या पुढे लोकल जात नसल्याने डोंबिवली स्थानकात संध्याकाळी येणाऱ्या दोन डोंबिवली लोकल मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या. डोंबिवली रेल्वे स्थानकात अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या आहेत. जलदगती येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर पाणी नसल्याने या रेल्वे मार्गावरील लोकल, लांब पल्ल्याची वाहतूक सुरळीत आहे. लोकलमध्ये अडकून पडलेले प्रवासी कधी झटपट घरी पोहचतो या विवंचनेत आहेत. बदलापूर, कर्जत, नेरळ, आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा भागात जाणारे बहुतांशी नोकरदार रेल्वे स्थानकापासूनच्या ३० ते ४०किलोमीटर परिसरातील गावांमध्ये राहतात. हे प्रवासी लोकलला संलग्न असलेल्या एस.टी.च्या बसवर अवलंबून असतात. लोकल उशिरा धावत असल्या की संलग्नित बस प्रवासी न घेताच निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहन, दुचाकी स्वाराला विनंती करुन घर गाठावे लागते. ठाण्याकडून डोंबिवलीकडे येणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.