कल्याण – कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिकच्या ड प्रभाग हद्दीत चेन्नई कित्त्याच्या (पॅटर्न) माध्यमातून विशेष कचरा संकलन मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मागील दोन दिवसात ड प्रभाग हद्दीतील विविध भागातून रात्रीच्या वेळेत ३३५ टन कचरा जमा करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करण्याचा पहिलाच अशाप्रकारचा प्रयत्न पालिकेकडून झाला आहे.
पालिका हद्दीतील कल्याण, डोंबिवलीतील सात प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या प्रभागांमधील कचरा पालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी करत होते. हे काम आता सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या माध्यमातून गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी ही विशेष कचरा संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेतील ड प्रभागातील कचरा संकलनाची मोहीम आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे सानु वर्गिस, प्रवीण भोईर, कक्ष अधिकारी विकास सोनावणे, पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत राबविण्यात आली. या कालावधीत कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर, कमलादेवी महाविद्यालयाचा मागील भाग, साईबाबा मंदिर, गुजराती चाळ, बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसर, मंगेशी संस्कार गृहसंकुल परिसरातून कचरा उचलण्यात आला.
रात्रीच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असते. रस्ते, परिसर मोकळे असतात. नागरिकांनी घरातील कचरा रात्री नऊ वाजेपर्यंत घर परिसरातील जागेत टाकलेला असतो. त्यामुळे ही मोहीम रात्रीच्या वेळेत राबविण्यात आली. या मोहिमेसाठी सफाई कामगारांचे विभागवार नियोजन करण्यात आले होते. ही मोहीम सुरू असताना परिसरातील नागरिकांमध्ये चेन्नई कित्त्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली शहरे स्वच्छतेच्याबाबतीत देशात अव्वल क्रमांकावर आणताना, शहर शून्य कचरा पातळीवर आणताना नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी. कचरा वेळेवर योग्य पध्दतीने दाराशी येणाऱ्या कचरा संकलकाला द्यावा, अशी जनजागृती मोहीम ड प्रभागात सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहरे स्वच्छ, सुंदर करण्याचा हा प्रयत्न आहे, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमांमुळे नागरिकांंमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढली आहे. या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. नागरिकांनी वेळोवेळच्या या स्वच्छता मोहिमांना, दररोज उचलल्या जाणाऱ्या कचरा संकलनाविषयी सहकार्य केले तर कचरा मुक्त शहर अभियान निर्धारित वेळेच्या अगोदर यशस्वी होईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.उमेश यमगर, साहाय्यक आयुक्त, ड प्रभाग, कल्याण पूर्व.