लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: मुसळधार पावसामुळे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, असा गैरसमज करुन पिसवली भागात सरकारी जमिनीवर बेकायदा चाळी उभारणाऱ्या भूमाफियांची नव्याने उभी राहत असलेली बांधकामे आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी जमीनदोस्त केली. अशाच प्रकारची कारवाई अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी टिटवाळा येथे केली. बल्याणी येथे सरकारी जमिनीवरील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या. पावसाळ्यात चाळी बांधताना पाणी जागीच उपलब्ध होते. पाणी वाहून आणण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे माफिया पावसाळ्यात बेकायदा चाळी बांधण्यास प्राधान्य देत आहेत.

आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना पिसवली भागात बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या आदेशावरुन सर्व बेकायदा चाळींची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.

हेही वाचा… ठाणे: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे पाऊण तासात मिळाली प्रवाशाला लॅपटॉपची बॅग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाळी उभारणीसाठीचे जोते, विटांचे ढीग नष्ट केले. या चाळी बांधताना माफिया खडकाची पावडर (ग्रीट), सिमेंटचे एकत्रीकरण वापरतात. हे मिश्रण कच्चे असते. भिंती नऊची बांधली जाते. अतिशय कच्चे बांधकाम माफिया करतात. या चाळीतील खोली पाच लाख रुपयांना विक्री केली जाते. यामध्ये रहिवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा चाळींमध्ये घरे खरेदीकरुन सामान्य व्यक्तिची फसवणूक होते. याठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अशा चाळी तात्काळ जमीनदोस्त केल्या जात आहेत, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.