ठाणे : ठाणे शहरातील अतिशय गजबजलेल्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळे व्यतिरिक्त म्हणजेच, सकाळी आणि सायंकाळ वगळता इतर वेळेत कायमस्वरूपी कार्यान्वित केला आहे. या सिग्नल यंत्रणेमुळे दिवसा बेशिस्त पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती. परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्याने काही दिवसांत ही यंत्रणा बंद करावी लागत होती.

ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे तीन चौक महत्त्वाचे आहे. यातील तीन हात नाका आणि कॅडबरी जंक्शन येथील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहेत. नितीन कंपनी चौकाला महामार्गासह इतर एकूण चार रस्ते या मार्गाला जोडले जातात. परंतु हे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत असते. अनेक पादचारी येथून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात. महापालिकेने येथील चौकात सिग्नल बसविला आहे. हा सिग्नल सुरू नाही. त्यामुळे चौकातील वाहतुक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि वाहतुक साहाय्यक चौकात उभे असतात. मागील अनेक वर्षांपासून येथे प्रायोगिक तत्त्वावर आठवडाभर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येत होते. सिग्नल सुरू केल्यास रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी वाढत होती. त्यामुळे अनेकदा हे प्रायोगिक प्रयत्न अयशस्वी ठरत होते.

हेही वाचा : कळवा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरपर्यंत रुग्णांच्या रांगा, ‘हे’ आहे कारण

काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी चौकात पाहाणी केली. तसेच सिग्नल यंत्रणाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार, सुमारे आठवड्याभरापासून या चौकात सकाळी ११ ते सायंकाळी चार किंवा पाच या वेळेत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर पुन्हा सिग्नल यंत्रणा बंद केली जाते. तसेच रात्री ९ नंतर वाहनांची वर्दळ कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने दुपारी चौकात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसला असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : डोंबिवली: कमळ चिन्हाला काळे फासणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन चौकात गर्दीच्या वेळे व्यतिरिक्त सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सिग्नल यंत्रणा आता कायमस्वरूपी असेल.

डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.