उल्हासनगरः दररोज सुमारे ३५० टन कचरा निर्माण करणाऱ्या उल्हासनगर शहराच्या एकमेव गायकवाड पाडा भागातील कचराभूमीवर कचरा टाकू देण्यास स्थानिकांना विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून गायकवाड पाडा येथील कचराभूमीवर कचरा टाकला जात नसून परिणामी शहरातील घंटागाड्यांनी शहरातील कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे पाऊस सुरू असताना झालेली ही कचराकोंडी आरोग्याचा प्रश्न निर्माण करू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सुमारे साडे पाच लाख लोकसंख्या असलेल्या उल्हासनगर शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही वर्षात उल्हासनगर शहराला स्वतःची हक्काची अशी कचराभूमी मिळू शकलेली नाही. त्यामुळे खेमानी भागातील कचराभूमीची क्षमता संपल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कॅम्प पाच भागातील गायकवाडपाडा येथील खदान परिसरात उल्हासनगर पालिकेने कचरा टाकण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी स्थानिकांनी याला विरोधही केला होता. मात्र तात्पुरती सोय असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने वेळ मारून नेली होती.

त्यानंतर सातत्याने या कचराभूमीला आग लागण्याचे प्रकार झाले. उल्हासनगर महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याचे कोणतेही विलगीकरण आणि वर्गीकरण करत नाही. परिणामी सर्व प्रकारचा कचरा या कचराभूमीवर एकत्रच येऊन पडतो. अनेकदा उन्हाळ्यात कचऱ्याच्या विघटनामुळे वायू तयार होऊन आग लागते. तर पावसाळ्यात पाऊस पडून या कचराभूमीतून दुर्गंधीयुक्त काळे पाणी वाहते. त्यामुळे शेजारच्या स्थानिकांना आरोग्याच्या समस्या सहन कराव्या लागतात. काही महिन्यांपूर्वी येथे एका कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाने एका बालकाला धडकही दिली होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पालिकेची कचऱ्याची वाहने रोखली होती.

आता मे महिन्यात पावसाने रिपरिप सुरू ठेवलेली असतानाच रहिवाशांनी पुन्हा कचराभूमीवर कचरा टाकण्यास विरोध सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून गायकवाड पाडा कचराभूमीवर कचऱ्याच्या गाडा जात नसल्याचे समोर आले आहे. परिणामी घंटागाड्यांनी शहरातील कचरा उचलणेही बंद केले आहे. त्यामुळे शहरातल्या विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. ही कचरा कोंडी तातडीने फोडावी अशी मागणी होते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या भागातूून कचरा उचलण्याचा तक्रारी येतात त्याच भागातला कचरा उचलला जात असल्याची माहिती कॅम्प चार आणि पाच भागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे पाऊस सुरू असताना कचरा उचलला न गेल्यास दुर्गंधी पसरून आरोग्य बिघडू शकते अशी भीती व्यक्त होते आहे.