ठाणे : ठाण्यात १७० एकरवर समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणामुळे उभ्या आयुष्यात क्लस्टर यशस्वी होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे राज्य सरकारच्या १७० एकर भूखंडावरील क्लस्टर योजनेस राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले.

ही योजना तुकडे करून राबविल्यास ती पूर्णत्त्वास येऊ शकेल. त्यामुळे १७० एकर भूखंडाचे दहा तुकडे करून ही योजना राबविण्यात यावी, असे आवाहन आव्हाड यांनी सरकारला केले.राष्ट्रवादीच्या वतीने ठाण्यात मोफत दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. क्लस्टरला आपणच राज्य शासनाकडून मान्यता मिळवून घेतली होती. पण, सध्या क्लस्टरच्या नावाखाली काहीजण आपली घरे भरण्याचे काम करीत आहेत, असे चित्र उभे राहिले, ते अभिप्रेत नव्हते. छोटय़ा छोटय़ा घरांमध्ये राहणाऱ्या, ज्यांची घरे धोकादायक झाली आहेत. त्यांना हक्काची आणि पक्की घरे मिळावीत म्हणून आपण क्लस्टर आणले होते. सध्या १७० एकर भूखंडावर क्लस्टर करण्याचे जे धोरण आखण्यात आलेले आहे. ते पाहता, उभ्या आयुष्यात क्लस्टर होणार नाही, असे आव्हाड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लस्टरची योजना जर दहा हजार मीटरवर राबविली तर ती शंभर टक्के पूर्णत्वास जाणार आहे. हा निर्णय सुरुवातीला क्लस्टरबाबत घेण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत होते. त्यावेळेस दहा हजार चौरस मीटरच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवायची, असे ठरविण्यात आले होते. आता १७० एकरवर क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढय़ा मोठय़ा भूखंडावर ही योजना राबविणे अशक्यच आहे, असेही आव्हाड म्हणाले.