कल्याण पश्चिमेतील बारावे येथील गेल्या चार वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. प्रक्रिया केंद्राभोवतीचा उन्हाने तप्त झालेला सुका कचरा आगीत जळू खाक झाला. आगीच्या झळा प्रक्रिया केंद्राला लागल्यामुळे प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कचरा एकाच ठिकाणी न ठेवता, त्याची प्रभागवार पध्दतीने विल्हेवाट लावावी या उद्देशातून प्रशासनाने शहराच्या विविध भागात बारा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामधील पाच ते सहा प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. बारावे प्रकल्प पूर्ण क्षमतेने घनकचरा विभागाकडून चालविला जातो. कल्याण पश्चिमेतील सुका कचरा येथे आणला जातो. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत तयार केले जाते. आधारवाडी कचराभूमी सारखे या केंद्रात मोठे कचऱ्याचे ढीग नाहीत. तरी आग लागल्याने घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बारावे परिसरातील रहिवासी गाढ झोपेत होते. यावेळी गुरुवारी रात्री बारावे कचराभूमीला आग लागली. कचऱ्याचा धूर परिसरातील नागरी वस्तीत पसरला. रात्रीच्या वेळेस घरात धूर कोठून आला म्हणून घाबरलेल्या रहिवाशांनी बाहेर पाहिले. त्यांना बारावे कचराप्रक्रिया केंद्राला आग लागल्याचे दिसले. जागरुक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन केंद्राल संपर्क केला. दोन बंब घटनास्थळी आले. त्यांनी अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत कचरा, प्रकल्प केंद्राचे नुकसान झाले आहे अशी माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. बारावे इथे घनकचरा प्रकल्प होऊ नये यासाठी मागील पाच ते सहा वर्षे या प्रकल्पाच्या विरोधात रहिवाशांचा जोरदार लढा सुरु होता. पालिका अधिकाऱ्यांनी रहिवाशांची मनपरिवर्तन करण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. रहिवाशांच्या सहकार्याने हा प्रकल्प आकारला आहे. आता प्रकल्प सुस्थितीत सुरु असतांना अचानक केंद्राला आग लागते. यामध्ये काही काळेबेरे आणि काही हितसंबंध मंडळींचा हात असू शकतो अशी शक्यता नाव न छापण्याच्यास अटीवर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्तीचकडे वाटचाल करु लागली आहेत. यामध्ये कचऱ्याच्या उलाढालीवर अवलंबित असलेले अनेक जण कचऱ्याच्या माध्यमातून मिळणारा मलिदा बंद झाल्याने नाराज आहेत. अशा हितसंबंधी कंटकांकडून असा प्रकार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आधारवाडी कचराभूमीला भीषण आग लागली होती. सुरक्षा रक्षक वाढवणार बारावे कचरा प्रकल्प पूर्ण सुरक्षित आहे. तेथे कचऱ्यापासून आग लागेल अशी परिस्थिती नाही. तरीही तिथे मध्यरात्री आग लागली असल्याने संशय येतो. या केंद्रांवर आता तीन पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक राहतील अशी खबरदारी घेतली जाईल. सुका कचऱ्याबरोबर ओला कचरा इथे आणून टाकला जाईल जेणेकरुन आगीचा प्रश्न निर्माण होणार नाही. वरिष्ठांशी चर्चा करुन आग आणि तेथील सुरक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. - डॉ. रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग