कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध कामांसाठी पालिकेच्या अनेक विभागांमधून ठेकेदार नियुक्त केले जातात. अनेक वेळा ठेकेदारांची कामे विहित वेळेत पूर्ण झाली नाहीत किंवा त्या ठेकेदाराची निविदेची मुदत संपुनही त्या विभागाकडून ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव आयुक्तांकडे दाखल केले जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची असून ठेकेदारांची मुदत संपण्याच्या एक महिना अगोदर नवीन ठेकेदार नियुक्तीचे प्रस्ताव दाखल करावेत, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांना दिला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेतील बहुतांशी ठेकेदार हे पालिकेतील अधिकारी, ठेकेदार यांच्या आशीर्वादाने काम करतात. मागील २० ते २५ वर्षापासून ठराविक कर्मचारी हे ठराविक विभागात काम करत आहेत. विशेषत बांधकाम, लेखा अभियांत्रिकी, लेखा विभाग, सामान्य प्रशासन, नगररचना विभाग, मलजल निस्सारण, वैद्यकीय विभाग, महिला आणि बाल कल्याण, समाज विकास विभागात असे कर्मचारी अधिक संख्येने आहेत. अशा विभागांत ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने काही ठराविक ठेकेदार त्या त्या विभागातील देखभाल दुरुस्ती, बांधकामाची कामे निविदांच्या माध्यमातून मिळविण्यात यशस्वी होत आहेत. याविषयी अनेक तक्रारी यापूर्वीच पालिकेकडे दाखल आहेत. अधिकारी या सगळ्या प्रकरणात सामील असल्याने अशा ठेकेदारांवर, कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कधीही प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नाही, असे सांगण्यात येते.
आयुक्तांची नजर
कल्याण डोंबिवली पालिकेत विविध विभागांकडून ठेकेदार वार्षिक, व्दैवार्षिक देखभाल, दुरुस्तीची कामे पदरात पाडून घेतात. घेतलेली कामे विहित वेळेत ते पार पाडत नाहीत. किंंवा त्या ठेकेदाराच्या निविदेची मुदत संपुष्टात आलेली असते. अशा ठेकेदारांचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून मुदतवाढीसाठी प्रस्ताव आयुक्तांकडे दाखल केले जातात. ही बाब आयुक्त गोयल यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पालिकेत काम करणाऱ्या कोणत्याही विभागातील ठेकेदाराचा निविदेचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी एक महिना अगोदर नवीन ठेकेदार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात, असे आदेश आयुक्त गोयल यांंनी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. या कार्यवाहीत संबंधित विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता यांनी हयगय केली तर त्यांना या दिरंगाईला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त गोयल यांनी दिला आहे.
सर्व विभागप्रमुखांनी या आदेशाचे पालन करावे. तसेच या संबंधीचे नियोजन करून ते आपल्या निदर्शनास आणण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पालिकेतील कोणत्याही विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची निविदेची मुदत संपण्यापूर्वी एक महिना अगोदर त्या कामासाठी नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी. संबंधित ठेकेदारांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव सादर केले जाऊ नयेत. या प्रक्रियेत हयगय करणाऱ्या विभागप्रमुख, कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई केली जाईल.- अभिनव गोयल आयुक्त.