कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शहाड येथील रेल्वे मार्गावरील पुलावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांची संथगतीने वाहतूक होत असल्याने पुलावर कोंडी होत आहे. दुपारच्या वेळेत शाळांच्या बसची संख्या वाढली आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहने वाहतूक करीत असल्याने पूलावर दोन्ही बाजुने वाहतूक कोंडी होते.

शहाड उड्डाण पूल कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत येत असला तरी, या पुलाचे नियंत्रण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४३ म्हणून हा मार्ग ओळखला जातो. या पुलावर खड्डे पडले असुनही पालिका अधिकाऱ्यांना याठिकाणी डागडुजीची कामे करता येत नाहीत. शहाड पुलावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने कल्याण वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

पुणे, अहिल्यानगर, जुन्नर, आंबेगाव, मुरबाड भागातून सकाळच्या वेळेत कल्याणमध्ये भाजीपाला, दूध घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना शहाड पुलावरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेत या रस्त्यावर जड, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. रात्री दहा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत शहाड उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी असते. लांब पल्ल्याच्या एसटी बस, खासगी वाहने या कोंडीत अडकतात. कल्याण मुरबाड रस्त्यावर म्हारळ, वरप परिसरात नामवंत शाळा आहेत. या शाळांच्या बस कल्याण शहर परिसरात विद्यार्थ्यांची नेआण करतात. विद्यार्थ्यांना या खड्ड्यांमुळे त्रास आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सकाळच्या वेळेत पुलावर कोंडी असेल तर विद्यार्थ्यांना शाळेत पोहचणे अवघड होते. शहाड पुलावरील खड्ड्यांविषयी प्रवाशांनी पालिकेत तक्रारींचा भडिमार केला आहे. परंतु, शहाड पूल पालिका हद्दीत येत असला तरी या पुलावरील देखभाल दुरुस्तीचे काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे, अशी उत्तरे देऊन पालिका अधिकारी मेटाकुटीला आले आहेत. कल्याणच्या वाहतूक विभागातील पोलिसांनी शहाड पुलावरील खड्डे लहान असताना त्यात विटा, माती, खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक पोलिसांनी बुजवलेले खड्डे उखडले आहेत.

पुलावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने या खड्ड्यात वाहन आदळून नये म्हणून वाहन चालक पुलावरून संथगतीने वाहने चालवित आहेत. यामुळे शहाड पुलाच्या दोन्ही बाजुला वाहनांचा रांगा लागत आहेत. कोळसेवाडी वाहतूक विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवुनही अधिकारी दखल घेत नसल्याने वाहतूक विभागाचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहाड उड्डाण पुलावरील खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पालिका म्हणून आपण आणि कल्याण वाहतूक विभागाने कळविले आहे. शहाड उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. – जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, कडोंमपा.