शासकीय, खासगी संस्थांमध्ये आपली ओळख आहे. तसेच अनाथलयातून आपण मुले दत्तक घेऊन घेण्याचे काम करतो, असे सांगून बेरोजगार तरूण, संतती नसलेल्या जोडप्यांची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. या सर्वांकडून विविध मार्गाने तीन लाख ५० हजार रूपये घेऊन फसवणूक करणाऱ्या कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीमधील एका तरूणाविरुध्द तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र नानाजी पाटील (३३) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथे राहणारा जयप्रकाश यादव (२५) याची ओळख जितेंद्र पाटील याच्याबरोबर झाली होती. जयप्रकाश नोकरीच्या शोधात होता. आपली अनेक सरकारी, खासगी आस्थापनांमध्ये ओळख आहे. आपण बेरोजगारांना नोकरी लावण्याची कामे करतो. कोणा जोडप्याला संतती नसेल तर त्यांना अनाथलयामधून दत्तक मुले घेऊन देण्याचे काम करतो, अशी बतावणी जितेंद्रने जयप्रकाश जवळ केली. स्वतःची अशी जाहिरात जितेंद्र अनेक ठिकाणी करत होता.

जितेंद्रच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जयप्रकाश आणि त्याच्या इतर साथीदारांनी २५ ते ३० हजार रूपये नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने जितेंद्रला दिले. हा व्यवहार कल्याण पूर्वेतील हनुमाननगरमधील ज्युपिटर औषध दुकाना जवळ घडून आला.

त्यानंतर जितेंद्रने काही जोडप्यांना आपण तुम्हाला अनाथलयातून दत्तक मूल घेऊन देतो असे सांगून त्यांच्याकडून २० हजारांपासून रकमा घेतल्या. अशी एकूण साडेतीन लाख रूपयांची रक्कम जितेंद्रने गोळा केली. पैसे देऊन वर्ष उलटले तरी कुठेही नोकरी लावत नाही म्हणून जितेंद्र व त्याचे साथीदार अस्वस्थ झाले. अशीच परिस्थिती दत्तक मुल घेण्यासाठी जितेंद्रला पैसे दिलेल्या जोडप्यांची झाली होती.

आम्हाला नोकरीत नियुक्तीची पत्रे कधी देणार, दत्तक मुल कधी घेऊन देणार असे प्रश्न पैसे देणारे तक्रारदार जितेंद्रकडे करू लागले. त्यांना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तक्रारदारांनी आपले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. पैसे परत मिळत नाहीत आणि नोकरीही मिळण्याची शाश्वती नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदारांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा जितेंद्र पाटील विरुध्द दाखल केला आहे. फरार जितेंद्रचा शोध पोलीस घेत आहेत.