कल्याण – कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात गणेश टेकडीवरील गणेश मंदिराजवळ भूमाफियांनी जागा बळकावण्यासाठी पत्र्याचे तात्पुरते निवारे उभारून, काही ठिकाणी पक्की बांधकामे करून जागा हडप करण्याचा प्रयत्न चालविला होता. या बेकायदा बांधकामांची माहिती मिळताच ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने गणेश टेकडीवरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.

काटेमानिवलीतील गणेश टेकडीवरील गणेश मंदिर भागात भव्य निवारे उभारण्यात आले आहेत. यामधील दोन निवारे पत्र्याचे आहेत. एक निवारा ताडपात्री टाकून उभारण्यात आला आहे. एका झोपडीचे बांधकाम याठिकाणी करण्यात आले आहे. एका निवाऱ्यात प्रार्थना स्थळ सुरू करण्यात आले होते. या बांधकामांविषयी तक्रारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्याकडे आल्या होत्या.

साहाय्यक आयुक्त यमगर यांनी गणेश टेकडीवर आणि परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही निवाऱ्यांमध्ये एका प्रार्थना स्थळ सुरू करून त्याठिकाणी देव देवतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या बांधकामावर कारवाई होऊ नये, असा त्यामागील उद्देश होता असे तोडकाम पथकाच्या निदर्शनास आले. नुकत्याच उभारण्यात आलेल्या एका झोपडीत एक कुटुंब वास्तव्य करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

बुधवारी तोडकाम पथक घेऊन साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी गणेश टेकडी गाठली. तेथील प्रार्थना स्थळातील देवदेवतांच्या मूर्ती कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत या विचाराने उपस्थित एका पुजाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या. ही बेकायदा बांधकामे कोणी बांधली आहेत याची माहिती स्थानिकांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली नाही. भूमाफियांचा याठिकाणी प्रार्थना स्थळ सुरू करून जागा हडप करण्याचा डाव असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहाय्यक आयुक्त यमगर यांनी वरिष्ठांच्या निर्देशावरून काटेमानिवली गणेश टेकडी भागातील प्रार्थना स्थळासह बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. याठिकाणची झोपडी तोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्याठिकाणी एक कुटुंब वास्तव्य करते. पावसाळाचे दिवस असल्याने झोपडीवरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली. दिवाळीनंतर या झोपडीतील रहिवाशांना काढून कारवाई करण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे. गणेश टेकडी परिसर हा कल्याण पूर्वेचे एक आकर्षण आहे. या टेकडीवरील मोकळ्या जागांवर भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी वळवली आहे. सात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही बांधकामे पाऊस सुरू असुनही तोडण्यात आली. याठिकाणी पुन्हा बांधकामे होणार नाहीत यादृष्टीने काळजी घेतली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त यमगर यांनी सांगितले.