मुंबई आणि परिसरात जागा उपलब्ध नाहीत त्यामुळे आता डोंबिवलीपल्याड अंबरनाथमध्ये उपलब्ध २०० एकर जागा म्हाडा विकत घेणार असून त्यावर म्हाडाची सर्वात मोठी वसाहत उभारण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ही माहिती दिली. म्हाडाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प असेल असेही आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राज्यात परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्या म्हाडातर्फे ठाणे जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू आहेत. गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात मोठमोठ्या गृहसंकुलांची उभारणी केली जाते आहे. नवनव्या वाहतुकीच्या साधनांमुळे, नव्या रस्त्यांमुळे अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि इतर शहरांशी सहजरित्या जोडली गेली आहेत. त्यामुळे या भागात अनेक नागरिक स्थलांतरीत होत आहेत. कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर खोणी, कल्याण तालुक्यात शिरढोण येथे म्हाडी सुमारे दोन हजार घरे उभारण्यात आली आहेत. मात्र अंबरनाथ तालुक्यात असा भव्य प्रकल्प नव्हता. अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी वसाहत उभारण्याची घोषणा केली आहे.

विश्लेषण : म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल कशासाठी?

अंबरनाथच्या चिखलोली परिसरात म्हाडाच्या वतीने सुमारे २०० एकर जागेचे सर्वेक्षण केले जाते आहे. ही जागा विकत घेण्याचे आम्ही निश्चित करत आहोत. येथे आतापर्यंतची म्हाडाची सर्वात मोठी वसाहत उभारण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये बोलताना दिली. येथील एका कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.

म्हाडा भूखंडावरील आमदार निधीतील बांधकामे बेकायदा!

अंबरनाथ, बदलापूर शहरांचा इतर शहरांशी वाढलेला संपर्क, रस्ते यामुळे ही वसाहत फायद्याची ठरेल. मुंबई आणि इतर शहरांमध्ये आता जागा उरलेली नाही. आता तो भारही या शहरांना पेलवणार नाही. त्यामुळे उपनगरांमध्येच हे प्रकल्प होतील. जागेची उपलब्धता आता अंबरनाथ, बदलापूर याच भागात आहे. त्यामुळे या भागात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्याचा मानस आहे, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्र्याला त्याच्या कारकिर्दीत भव्य असा प्रकल्प करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे माझ्या कारकिर्दीतील हा मोठा प्रकल्प ठरेल अशी आशाही यावेळी आव्हाड यांनी व्यक्त केली.

जपानच्या शासकीय कंपनीची मदत

या प्रकल्पासाठी जपानच्या शासकीय कंपनीशी बोलणी सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतेच म्हाडाच्या अधिकाऱ्यानी ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आहे. यावेळी म्हाडाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.