ठाणे : भिवंडी येथे हत्येप्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रामआशिष पटेल आणि सागर कटाळे अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. २०१७ मध्ये या दोघांनी घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरुन महिला आणि तिच्या पतीवर चाकूने हल्ला केला होता. यात तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आणि तिचे पती राहत होते. ते घरात झोपले असताना, रामआशिष आणि सागर हे दोघे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी दोघांकडून पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या दोघांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांनी महिलेच्या पतीच्या पोटात चाकू भोसकला. तर महिलेच्या डाव्या कुशीत चाकू मारून गंभीर दुखापत केली. यात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. तिने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी रामआशिष याला अटक केली. याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी केला.

रामआशिष याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची परवानगी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर त्याच्याविरोधात मोक्का कायद्याचे कलम वाढविण्यात आले. पोलिसांनी सागर यालाही त्यानंतर अटक केली. दोघांविरोधात सबळ पुरावे गोळा करून ठाणे येथील मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खटल्याची सुनावणी मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित एस. शेटे यांच्या न्यायालयात सुरु होती. विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी गुन्ह्यातील साक्षीदार यांना साक्ष देतावेळी हजर ठेवणे, माहिती देणे याबाबत मार्गदर्शन केले. पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विकास पाटील यांनी पैरवी म्हणून कामकाज पाहिले. न्यायालयाने साक्षीपुरावे ग्राह्य धरून सोमवारी रामआशिष आणि सागर या दोघांना हत्येप्रकरणी जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन वर्ष साधी कैद, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्ष कैद आणि २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद तसेच कलम ४६० अंतर्गत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.