ठाणे : धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. अवकाळी पावसात दुभती जनावरे वाहून गेलेल्या अथवा मृत पावलेल्या शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरे दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरनाईक कुटुंबांकडून विशेष भेट दिली जाते. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देणाऱ्या आपल्या नेतृत्वाला आगळया- वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भेट द्यावी या उद्देशाने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे महापुरामध्ये वाहून गेली, अशा शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरिता त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून १०१ दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात नवचैतन्य फुलविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्राध्यापक सतीश मापने यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र लिहिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या साथीदार असलेल्या दुभती जनावरे अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली तर काही मृत पावली त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी दुपती जनावरे द्यावी, अशी संकल्पना त्यांनी मांडली, असे मंत्री सरनाईक म्हणाले. आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.

पिकं, भांडीकुंडी, संसारातील लहानसहान वस्तूंसह त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेली जनावरंही वाहून गेली. शेतकऱ्यांचा संसार पुन्हा उभा राहावा, म्हणून आम्ही त्यांना दुधाळ गोवंश भेट म्हणून देत आहोत. या जनावरांच्या माध्यमातून त्यांचा संसार नव्याने बहरो, हीच आमची खरी दिवाळी भेट आहे. शेतकऱ्यांचा संसार फक्त सरकारी मदतीवर उभा राहणार नाही. आपण सर्वांनी समाजभावनेतून पुढे येऊन त्यांना हात द्यावा. कारण शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं, आपल्या अन्नदात्याचं पुनर्जन्म घडवणं आहे, असे सरनाईक म्हणाले.